शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४


देश निरोगी राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियानात
सर्वांनी योगदान द्यावे : मुख्यमंत्री
मुंबई, दि.15:  स्वच्छ भारत अभियानात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग महत्‍त्वाचा असून जोपर्यंत स्वच्छता हा आपल्या दैनंदिन कामाचा भाग होणार नाही, तोपर्यंत आपला देश, आपले राज्य व आपले शहर स्वच्छ होणार नाही. त्यामुळे देशाबरोबरच आपल्या राज्यालाही निरोगी करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी योगदान द्यावे,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत आज अनुयोग  विद्यालय, जवाहर नगर, खार (पूर्व) येथे स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्‍यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार पूनम महाजन, आमदार ॲड .आशिष शेलार, नगरसेवक महेश पारकर, सिनेअभिनेते मधुर भंडारकर, कपिल शर्मा उपस्थित होते.
       
मुख्यमंत्री म्हणाले, स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच आपले शहर, परिसर स्वच्छ होईल अशी, अपेक्षा करणे चुकीचे आहे. स्वच्छतेच्या कामी प्रत्येक नागरिकांचा सहभाग असला पाहिजे. विद्यार्थ्यांचा स्वच्छता अभियानातील सहभाग महत्‍त्वाचा असून विद्यार्थ्यांनी स्वत:पासूनच स्वच्छतेला सुरुवात करावी. आपल्या घरात, परिसरात स्वच्छतेसाठी काम करावे. आपल्या पालकांनाही स्वच्छतेबाबत माहिती द्यावी. आरोग्यावर आपण हजारो कोटी रुपये खर्च करतो. स्वच्छता ठेवली तर आपल्या बरोबर देशही निरोगी राहील. त्यासाठी स्वच्छ भारत अभियान हाती घेतले असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वच्छतेचे आवाहन केले आहे. प्रत्येक भारतीयाने  यामध्ये योगदान देणे आवश्यक आहे. देशभरात स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून मुंबईतही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खासदार पूनम महाजन म्हणाल्या, स्वच्छता अभियानात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्‍त्वाचा असून प्रत्येक नागरिकाने आपले घर, आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत यावेळी स्वच्छता दिंडी काढण्यात आली. यात खासदार पूनम महाजन, नगरसेवक महेश पारकर यांच्यासह शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक आदींनी सहभाग घेतला.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा