शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

कृतज्ञता सोहळा



कॉ.माधवराव गायकवाड  यांनी न्यायिक मार्गाने
 प्रदीर्घ लढा देऊन खंडकऱ्यांचे प्रश्न सोडविले
                          -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
            श्रीरामपूर दि.30- कॉ.माधवराव  गायकवाड  यांनी महाराष्ट्रातील खंडकरी,शेतकरी यांच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून गेली 50 वर्षे सातत्याने न्यायिक मार्गाने लढा देऊन खंडकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला. कॉ.गायकवाड यांनी वैधानिक मार्गाने दिलेला हा लढाअनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
            श्रीरामपुर येथील तहसिल कार्यालयाच्या जवळील कुस्ती आखाडा मैदानावर राज्य खंडकरी,शेतकरी कृति समितीचे नेते कॉ.श्री.माधवराव गायकवाड त्यांच्या सहकार्यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
             यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कॉ.गायकवाड यांना 5 लाख रुपयांचा धनादेश आणि मानपत्र अर्पण करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील खंडकरी शेतकरी यांच्या जमिनी परत करण्यासाठी कॉ.गायकवाड यांनी गेली 50 वर्षे सातत्याने लढा देऊन प्रदीर्घ लढा जीवंत ठेवला. आयुष्यात काही क्वचित क्षण असतात त्यापैकी हा एक क्षण होय. कॉ. माधवरावांनी या लढयाचे यशस्वी नेतृत्व करतांना आपले कर्तृत्व पणाला लावले. कम्युनिस्ट पक्षाचा संबंध रक्तरंजित लढयाशी जोडला जातो. पण हा लढा घटनेच्या चौकटीत राहुन संयमाने दिलेला लढा होय. राज्य मंत्रिमंडळातील सदस्य महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री विखे पाटील, वनमंत्री पतंगराव कदम इतर सदस्यांनी आपापल्या परीने याकामी सहकार्य केले. हा न्याय्य लढा निकाली लागला पाहिजे ही शासनाची भुमिका आहे. 30 ऑगस्ट रोजी मा. सुप्रिम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. अजुनही शेवटचा टप्पा बाकी आहे. जमिनीचे वाटप करावयाचे आहे. या संदर्भातील प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  
            कॉ.माधवराव गायकवाड यांची कन्या श्रीमती साधनाताई गायकवाड यांनी यावेळी कॉ.गायकवाड यांचे भाषण वाचून दाखविले. शेतकरी बंधु भगिनिंनो आज आपण आनंद साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 59 वर्षे सर्वजण मिळून संघर्ष करुन आतूरतेने वाट पाहतो तो दिवस आज आहे. माझ्याबरोबर काम करणाऱ्या 2 पिढ्या माझ्यासोबत हा आनंद सोहळा पाहण्यासाठी नाहीत याचे मला दु:ख होत आहे. नव्या पिढीला आनंद देण्यात यशस्वी झालो. खंडकरी शेतकऱ्यांच्यावतीने हा कृतज्ञता सोहळा करण्यात येत आहे त्याबद्दल आयोजकांचे आभार.      

                                                            00000

नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन




श्रीरामपूर नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्राचे
मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन
       श्रीरामपूर, दि. 30:- श्रीरामपूर नगर परिषदेच्या संगणक प्रणालीच्या अंमलबजावणीकरीता तयार करण्यात आलेल्या नागरी सुविधा केंद्राचे उद् घाटन मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
     या समारंभास वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष जयंतराव ससाणे, जिल्हाधिकारी संजीव कुमार, आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष मंदाताई कांबळे, पक्ष प्रतोद सौ. राजश्री ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत त्यांच्या वेळेची बचत व्हावी या दृष्टिने जास्तीत जास्त पारदर्शी सेवा देण्याचा नगर परिषदेचा उद्देश या केंद्रामुळे सफल होणार आहे.
    यावेळी  मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी नागरी सुविधा केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण केले. नागरी सुविधा केंद्राची पाहणी करुन देण्यात  येणाऱ्या  सुविधांची माहिती घेतली. या नागरी सुविधा  केंद्रात ऑनलाईन संगणकीय सेवा सुरु केल्यामुळे सर्व प्रशासकीय कामकाज संगणकावर होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात गती येणार आहे. नागरिकांची कामे कमी वेळेत पूर्ण करणे कर्मचाऱ्यांवर बंधनकारक आहे.   
    श्रीरामपूर शहरवासियांना विविध स्वरुपाच्या मुलभूत सेवा पुरविणारी राज्यातील एकमेव नगर परिषद आहे. या केंद्रामार्फत नगर पालिकेकडे येणा-या सर्व प्रकारचे टपाल, अर्ज, निवेदने त्यांची प्रणाली मध्ये नोंद होऊन त्यावरील संपूर्ण कार्यवाही बाबत पाठपुरावा होइल. नागरिकांच्या विविध स्वरुपांच्या तक्रारींचीही नोंद प्रणालीमध्ये करण्यात येईल. तक्रार निवारणासाठी संबंधित विभागाना पाठविणे, जन्म, मृत्यू दाखले, विविध विभागामार्फत देण्यात येणा-या सुविधांच्या प्रतिंचे वितरण, बिल भरणा मदत कक्ष प्रपत्राची विक्री आदीची सोय आहे.
             
00000


मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नवी दिल्ली दौरा

      केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत भेट घेतली.


      केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्री वायलार रव‍ि यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  भेट घेतली.


            केंद्रीय कंपनी कामकाज मंत्री विरप्पा मोईली यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  भेट घेतली.


गुरुवार, २९ सप्टेंबर, २०११

कण्हेरखेड येथे टुरिझम कॉम्प्लेक्स विकसित करणार



कण्हेरखेड  येथे टुरिझम कॉम्प्लेक्स  विकसित करणार - मुख्यमंत्री

            सातारा, दि. 29 : लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि स्मृती जतन करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून टुरिझम कॉम्प्लेक्स निर्माण करुन कण्हेरखेडच्या पर्यटन विकासाला गती दिली जाईल अशी घोषणा, मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे बोलताना केली.
            कोरेगांव तालुक्यातील कण्हेरखेड येथे स्व. श्रीमंत महाराज माधवरावजी शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण, राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत कण्हेरखेड नळपाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन आणि सांस्कृतिक भवन इमारतीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वाणिज्य उद्योग राज्यमंत्री जोतिरादित्य शिंदे हे होते तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर होते. समारंभास वनमंत्री  डॉ. पतंगराव कदम, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती जाधव आदी उपस्थित होते.
            कण्हेरखेड गावाला शिंदे घराण्यामुळे  फार मोठी परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभला असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले,  कण्हेरखेडच्या शिंदे घराण्याने देशात केलेली कामगिरी तसेच मराठ्यांच्या साम्राज्य स्थापनेसाठी केलेले काम कौतुकास्पद असून त्यांच्या स्मृती जोपासण्याबरोबरच ऐतिहासिक 16 खांबी स्मृतिस्तंभ, राणोजींचा वाडा अन्य ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन कॉम्प्लेक्स निर्माण करण्यासाठी  पर्यटन आराखडा तयार करण्यात येईल.
कण्हेरखेडसाठी 24x7 पाणीपुरवठा योजना-मुख्यमंत्री
            कण्हेरखेड गावासाठी 24x7 पाणीपुरवठा योजना राबविली जाईल, यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने शासनास पाठवावा अशी सूचना करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले,  कण्हेरखेड गावासाठी शासनाने मंजूर केलेल्या 60 लाखाच्या नळपाणीपुरवठा योजनेची भरावी लागणारी 10 टक्के  लोकवर्गणीच्या रक्कमेची जबाबदारी  शिंदे घराण्याने उचलून वचनपूर्ती केली आहे. शासनाच्या वतीने  कण्हेरखेड 24x7 योजना राबवून 24 तास मीटरने पाणी देण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले.
            याप्रसंगी बोलताना केंद्रीय वाणिज्य उद्योग राज्यमंत्री जोतिरादित्य शिंदे म्हणाले, कण्हेरखेड गावाशी माझं जिव्हाळ्याचे नातं असून कण्हेरखेडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उन्नतीसाठी केंद्र शासनाबरोबरच मी आणि माझे घराणेही कटीबध्द राहील.
            याप्रसंगी  पालकमंत्री रामराजे नाईक- निंबाळकर,   वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आदींनीही आपले विचार व्यक्त केले.  प्रारंभी कण्हेरखेडच्या सरपंच अर्चना शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. शेवटी विजय शिंदे यांनी आभार मानले. समारंभास आमदार सर्वश्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप  जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
000