शुक्रवार, १० मे, २०१३

विकेंद्रीकृत पाणी साठ्यावर भर द्यावा लागेल : मुख्यमंत्री
पुणे, दि. 10 – राज्यात वारंवार पडणाऱ्या दुष्काळाच्या स्थितीवर मात करण्यासाठी विकेंद्रीकृत पाणी साठ्यावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमांतर्गत(यूएनडीपी) देण्यात येणाऱ्या इक्वेटर पुरस्काराचे आज त्यांच्या हस्ते वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. येथील हॉटेल कोर्टयार्ड मॅरियाट येथे झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील  जुन्नर आणि मंचर परिसरात कार्यरत असणाऱ्या शाश्वत संस्थेच्या आनंद कपूर यांना गौरविण्यात आले. यावेळी युएनडीपीच्या भारतातील प्रमुख लिस ग्रँड उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्याचा परिणाम पर्जन्यमानावरही परिणाम जाणवत आहे. राज्यात गेली दोन वर्षै सतत दुष्काळ आहे. दुष्काळाशी सामना करताना आता पाणी साठ्यांचे विकेंद्रीकरण करावे लागेल. त्यासाठी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, शेततळी, लघु पाटबंधारे आदींच्या सहाय्याने पाणी साठी वाढवला पाहिजे.
येत्या काही वर्षात राज्यातील ऊस शेतीला ठिबक सिंचनाव्दारे पाणी देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, महानगरपालिकांनी पाणी पुरवठा करताना तो मीटरव्दारेच करावा. यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. पाणी वितरण आणि वापर या दोन्ही बाबतीत कटाक्षाने काळजी घेण्याची गरज आहे.
राज्यातील दरडोई उत्पन्न वाढत आहे. पण त्याचबरोबर अद्याप काही घटक विकासाच्या प्रक्रियेबाहेर आहेत. त्यांना विकासासाच्या परिघात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्था अतिशय चांगले काम करू शकतात. शाश्वत संस्थेने जुन्नर आणि मंचर परिसरात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्यासारख्या अनेक संस्थांनी ग्रामीण भागातील लोकांच्या सक्षमीकरणासाठी पुढे यायला हवे. शासनाची त्यांच्यासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका राहिल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी शाश्वत संस्थेचे आनंद कपूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. लिस ग्रँड यांनी इक्वेटर पुरस्काराबाबत सविस्तर माहिती दिली. दर दोन वर्षीनी हा पुरस्कार दिला जातो. ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षमीकरणासाठी केलेल्या विविध प्रयोगासाठी हा पुरस्कार दिला जातो. जगातील पंचवीस संस्थांना असा पुरस्कार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
             0000 
दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत

मिळण्याकडे लक्ष द्या – मुख्यमंत्री पुणे, दि. 10 -  दुष्काळग्रस्त नागरिकांना सर्वप्रकारची मदत तत्काळ मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष द्या, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिल्या.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज येथे पुणे विभागातील दुष्काळी जिल्ह्यातील परिस्थिती, दुष्काळावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना याबाबतचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीत विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती आणि त्यावर प्रशासनातर्फे सुरू असलेल्या उपाययोजना याबाबतचे सादरी करण केले.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळाची तीव्रता जास्त  आहे. त्यामुळे नागरिकांना तात्काळ मदत करा. चारा छावणी, टँकरने पाणी पुरवठा, चारा डेपो आणि रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा. मागेल त्याला तत्काळ काम मिळेल याकडे लक्ष द्या. चारा छावणीचे नियोजन व्यवस्थित सुरू आहे का? ते पाहण्यासाठी छावण्यांना अचानक भेट द्या.
दुष्काळाच्या या परिस्थितीत नाले, बंधारे, लघु पाटबंधारे यामधील गाळ काढण्यासाठी लोकांचा सहभाग घ्या. त्यासाठी आवश्यक असल्यास आमदार आणि खासदार निधीचा वापर करा. या कामासाठी महात्मा फुले जलसंधारण अभियानातूनही निधी देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
शंभर हेक्टरहून आधिक क्षेत्र असणाऱ्या तलावांची जिल्हावार यादी तयार करा. त्यामधील गाळ काढण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव पाठवा. त्यास निधीची तरतूद केली जाईल. नाला सरळीकरण आणि खोलीकरणाच्या कामाचे स्वतंत्र नियोजन करा, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे, साताराचे जिल्हाधिकारी रामस्वामी, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत नारनवरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एच.एम. बिराजदार, कार्यकारी अभियंता अविनाश सुर्वे आदी अधिकारी उपस्थित होते.
000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा