मंगळवार, ८ मे, २०१२



राज्यातील दुष्काळी परिस्थिती व सिंचन कार्यक्रमासाठी
महाराष्ट्राचे केंद्राकडे मदतीचे निवेदन
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील
शिष्टमंडळाने घेतली  पंतप्रधानांची भेट




नवी दिल्ली, दि. 8 :  राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची माहिती देऊन केंद्र शासनाकडून ठोस मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आज संसद भवनात पंतप्रधान मनमोहनसिंह यांची भेट घेतली.  या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठीच्या  उपाययोजनांसाठी  सुमारे 2700 कोटी रूपयांच्या मदतीची केंद्राकडे मागणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आज पंतप्रधानांना भेट दिलेल्या शिष्टमंडळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य,  केंद्रातील मराठी मंत्री तसेच खासदारांचा समावेश होता.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मागच्या वर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे खरीप व रब्बी हंगामावर परिणाम झाला. एकुण 6201 गावांमध्ये खरीप हंगामात तर 1532 गावांमध्ये रब्बी हंगामात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली.
राज्य शासन सर्वोतोपरीने दुष्काळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या परिस्थितीत राज्याला केंद्राकडुन  अधिकाधिक आपत्कालीन आर्थिक मदत ‍मिळावी यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधानांनी दुष्काळी परिस्थितीत केंद्र शासन राज्याच्या सर्वोतोपरी पाठीशी असून याकरिता केंद्रीय पाहणी समित्या तातडीने पाठविण्यात आल्या होत्या. त्यांचा अहवाल तसेच राज्य शासनाचा अहवाल प्राप्त झाला असून, आजच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनावरही त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तातडीची उपाययोजना  म्हणून आपत्कालीन मदत निधीतून जास्तीत जास्त मदत देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
दुष्काळी परिस्थितीबाबत निवेदन देण्याकरीता मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांसोबत संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही आज सकाळी संसद भवनात  भेट घेतली. तत्पूर्वी  काल सायंकाळी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा दौरा करून गेलेले  काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्यासोबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
आज पंतप्रधानांच्या भेटीस गेलेल्या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे,  विलासराव देशमुख, प्रफुल्‍ल पटेल,  राजिव शुक्ला, प्रतिक पाटील,  मिलिंद देवरा, खासदार गोपीनाथ मुंडे,  विलास मुत्तेमवार, गुरूदास कामत, हुसेन दलवाई, उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे, प्रिया दत्त, वंदना चव्हाण, दिलीप गांधी, हंसराज अहीर, संजय राऊत, भरतकुमार राऊत, सुरेश कलमाडी, डॉ. निलेश राणे, तारीक अनवर,  माणिकराव गावित, ए.टी. नाना पाटील, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, सुभाष वानखेडे, मारोतराव कोवासे, भास्करराव पाटील खतगांवकर,  रावसाहेब दानवे पाटील, हरीश्‍चंद्र चव्हाण, समीर भुजबळ, बळीराम जाधव, सुरेश टावरे,  डॉ. संजीव नाईक, संजय निरूपम, संजय दिना पाटील, एकनाथ पाटील, गजानन बाबर,शिवाजीराव आंदळराव पाटील, जयवंतराव आवळे, सदाशिवराव मंडलिक इ. मान्यवरांचा समावेश होता.
राज्यातील मंत्री मंडळातील सहकारी नारायण राणे, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, डॉ. पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, लक्ष्मणराव ढोबळे, जयदत्त क्षीरसागर, डॉ. नितीन राऊत, मधुकरराव चव्हाण हे यावेळी उपस्थित होते.

याशिवाय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी,  केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांचीही भेट घेतली.  या भेटीदरम्यान मुंबईतील प्रस्तावित डॉ. आंबेडकर स्मारकाकरिता इंदु मिलमधील जमीन मागणी, अरबी समुद्रातील शिवाजी छत्रपती स्मारक, मुंबईतील इमारतीच्या उंचीबाबत नवीन मार्गदर्शक सूचनांबाबत  तसेच राज्यातील पर्यावरण व वन  विषयक विविध मुद्यांवरही चर्चा केल्याची माहिती पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी  दिली.

                                          000000

                                                                 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा