शुक्रवार, २८ मार्च, २०१४

सिंधुदुर्गातील कातळशिल्पे आता इंटरनेटवर
सतीश लळीत यांनी बनविला ‘पाषाणकला’ ब्लॉग
­­­­­
मुंबई, दि. 27 : सिंधुदुर्गातील कुडोपीची कातळशिल्पे आता हौशी रॉक आर्ट संशोधक सतीश लळीत यांच्या ब्लॉगमुळे जगभरात पोचली आहेत. या कातळशिल्पांची माहिती सर्वांना मिळावी, म्हणुन श्री. लळीत यांनी मराठी व इंग्रजीतील www.pashankala.blogspot.in हा ब्लॉग तयार केला आहे.
अश्मयुग, नवाश्मयुग, ताम्रयुग, लोहयुग आदि काळात आदिमानवाने दगडात कोरलेली, खोदलेली किंवा गुहांच्या भिंतीवर रंगविलेली अशी चित्रे जगभरात सापडतात. ती रॉक आर्ट म्हणुन ओळखली जातात. भारतातही मध्यप्रदेश, केरळ, तामिळनाडु, गोवा राज्यात अशी गुहाचित्रे किंवा पाषाणचित्रे आढळली आहेत. सिंधुदुर्गातही हिवाळे (ता. कुडाळ) येथील कातळशिल्पांचा शोध श्री. सतीश लळीत व प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी 2002 साली लावला होता.
 त्यानंतर सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर ॲण्ड टुरिझम डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे ॲड. प्रसाद करंदीकर, अविनाश पराडकर, डॉ. कमलेश चव्हाण (देवगड), चंद्रवदन कुडाळकर (मालवण) या युवकांच्या चमुने कुडोपी येथे अशाच प्रकारची कातळशिल्पे शोधुन काढली.
हिवाळे, कुडोपी, विर्डी येथे सापडलेल्या कातळशिल्पांचा अभ्यास करुन श्री. सतीश लळीत यांनी यावरचा शोध निबंध रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या बदामी (कर्नाटक) येथे 16 ते 18 नोव्हेंबर 2012 रोजी झालेल्या 17व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सादर केला. यामुळे हा विषय जागतिक पातळीवर गेला. अनेक वृत्तपत्रांनी आणि दोनशेहून अधिक संकेतस्थळांनी याची दखल घेतली. ‘पाषाणकला’ या ब्लॉगवर हा शोधनिबंध, बदामी परिषदेत सादर केलेले चित्रमय सादरीकरण, छायाचित्रे, मुलाखती, वृत्तपत्रीय कात्रणे यांचा समावेश आहे.
कुडोपी येथे सापडलेली कातळशिल्पे ही अंदाजे पाच ते सात हजार वर्षापूर्वी नवाश्मयुगातील आदिमानवाने केलेली अभिव्यक्ती असून याठिकाणी असलेल्या 60 हून अधिक कातळशिल्पांमध्ये असलेले मुख्य कातळशिल्प मातृदेवतेचे असल्याचा निष्कर्ष श्री. लळीत यांनी काढला. या परिषदेला उपस्थित असलेल्या रॉक आर्ट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ही .. पूर्व 7000 ते 4000 वर्षांपुर्वीची असुन अत्यंत महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले. जांभ्या दगडावर एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी अशी कातळशिल्पे आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गोव्यातील उसगाळीमळ, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळे, कुडोपी, खानवली (राजापूर), निवळी (रत्नागिरी) अशा अनेक ठिकाणी पश्चिम किनारपट्टीवर ही कातळशिल्पे आढळली असून त्यामध्ये काही परस्परसंबंध (लिनिएज) असण्याची शक्यता निश्चितच आहे. पुरातत्वीय दृष्ट्या खुप महत्वाची आणि या भागातील आदिम मानवी समुह त्यांची वसतीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकतील, अशी कुडोपी हिवाळे सारखी अनेक ठिकाणे कोकण किनारपट्टीवर आहेत. मात्र, त्यांचे तज्ञांकडुन वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यास कोकण प्रदेशाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे, असे मत श्री. लळीत यांनी व्यक्त केले आहे.                                                          
                                                       ००००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा