सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

महाराष्ट्रात ‘अन्न सुरक्षा’ यशस्वीपणे राबविणार
अन्न सुरक्षा कायदा हा भुकेशी लढा देणारा
जगातील एक सर्वात आगळा वेगळा कार्यक्रम
                             -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुंबई, दि. 26 : देशातील 82 कोटी जनतेला स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून देणारा अन्न सुरक्षा कायदा हा राजकीय व सामाजिक पातळीवर आमूलाग्र परिवर्तन घडवणारा असून कोणीही उपाशी रहाणार नाही याची खात्री देणारा आगळावेगळा असा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात हा कायदा यशस्वीपणे राबविण्याचा आमचा निर्धार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
युपीए-2 सरकारने मांडलेले अत्यंत महत्वांकाक्षी असे अन्न्‍ा सुरक्षा विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. याबद्दल समाधान व्यक्त करुन श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, अन्न सुरक्षा कायदा अनेकांचे आयुष्य बदलवून टाकणारा आहे. देशातील दोन तृतीयांश जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देणाऱ्या ऐतिहासिक अन्न सुरक्षा विधेयकाची संयुक्त राष्ट्रानेही प्रशंसा केली आहे. त्यामुळे या कायद्याला जागतिक महत्त्व आहे.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षेचे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसची गरीबी हटाओ घोषणा आता खऱ्या अर्थाने परीपूर्ण होणार आहे. युपीएच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, उपाध्यक्ष श्री राहुल गांधी व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वंकष विचार विनिमय करुन गरिबांचे कल्याण करणारा हा निर्णय घेतला आहे. हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल श्री. चव्हाण यांनी श्रीमती गांधी व पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे.
000000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा