मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२




विदेशी गुंतवणुकीला व्यापा-यांनी
विरोध करु नये - मुख्यमंत्री चव्हाण

            ठाणे, दि. 23 :  विदेशी गुंतवणुकीसंदर्भात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून व्यापा-यांनी विरोध करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
          डोंबिवली व्यापारी महासंघाने आयोजित केलेल्या ऋणनिर्देश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. गणेश नाईक, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, खा. आनंद परांजपे, खा. सुरेश टावरे, आ. संजय दत्त, आ. निरंजन डावखरे, आ. रामनाथ मोते, आ. एकनाथ शिंदे, आ. रवींद्र चव्हाण, आ. रमेश पाटील, आ. गणपत गायकवाड, आ. प्रकाश भोईर, महापौर वैजयंती गुजर-घोलप, जिल्हाधिकारी पी. वेलरासू, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुरूंदकर उपस्थित होते.
          मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, रोजगार निर्मितीची जबाबदारी शासनाची राहिली नसून ती आता उद्योजकावर आहे. उद्योजक, व्यापाऱ्यांनी कायद्याचे पालन करुन शासनाला सहकार्य केले पाहिजे. विदेशी गुंतवणूक ही काळाची गरज आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी गरजेची आहे. यापूर्वीही अनेक परदेशी उद्योग भारतात, महाराष्ट्रात आले, तेव्हा येथील उद्योग, दुकाने बंद झाली का ? त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही.

          या कार्यक्रमात बोलताना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक म्हणाले की, व्यापारी वर्गाबद्दल पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. व्यापाऱ्यामुळे आपल्याला कर मिळतो. त्यामुळेच अनेक कल्याणकारी योजना राबविता येतात.
                यावेळी व्यापाऱ्यांनी मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. प्रारंभी आ. रवींद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनिल वाघारकर, आशिष पेडणेकर, अतुल शहा, हेमंत राठी यांचीही भाषणे झाली. यावेळी कल्याण डोंबिवली परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा