मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२


ई गव्हर्नन्सचा वापर करुन प्रशासकीय
क्षमता वाढवावी - मुख्यमंत्री चव्हाण

            ठाणे, दि. 23 : राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी ई गव्हर्नन्सचा वापर करून प्रशासकीय क्षमत वाढवावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या संगणकीकरण दशकपूर्ती कार्यक्रम प्रसंगी ते अत्रे नाटयगृहात बोलत होते.
            यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, खा. सुरेश टावरे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव देवाशिष चक्रवर्ती, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, जिल्हाधिकारी पी. वेलरासू, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुरूंदकर, महापौर वैजयंती गुजर-घोलप, आयुक्त रामनाथ सोनवणे उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, संगणकीकरणासाठी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सर्वांनी ई-प्रणालीचा वापर नागरी सेवेसाठी करुन हे राज्य पुढे जाण्यासाठी हातभार लावावा,असे आवाहनही त्यांनी केले.
            याच कार्यक्रमात महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनीही संगणकीकरणाचा महानगरपालिकेस झालेल्या उपयोगाची माहिती दिली. प्रारंभी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेने गेल्या 10 वर्षात संगणकीकरणाचा वापर कशा प्रकारे केला, याची माहिती दिली.
            याच कार्यक्रमात संगणक तज्ज्ञ डॉ. जितेंद्र मंडालिया यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यातील विविध नगरपालिका आणि महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा