बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२


राज्याच्या गतिमान विकासासाठी  प्रशासनाचा
लोकाभिमुख दृष्टीकोन महत्वाचा - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 29 : राज्याच्या गतिमान विकासासाठी शासन आणि प्रशासनाचा लोकाभिमुख दृष्टीकोन महत्वाचा असून सामान्य नागरिक केंद्र बिंदू मानून पारदर्शक प्रशासन राबविण्यावर भर द्यावा, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.
आज मंत्रालयात राजपत्रित अधिकारी महासंघाचा 26 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मुख्य मंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र धोंगडे, सरचिटणीस ग.दि. कुलथे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. 
प्रशासकीय वर्गाला दिल्या जाणाऱ्या वेतनश्रेणी निश्चितीच्या कामातील त्रुटी दूर केल्या जातील असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अधिकारी कर्मचारी हे त्यांच्या सेवा काळात त्यांच्या कार्यसहभागाने प्रशासनाला गतिमान ठेवत असतात. त्यांचे हे महत्व पूर्ण योगदान लक्षात घेता, 80 ते 100 या वयोगटातील वयोवृध्द सेवानिवृत्त धारकांना वाढीव पेन्शन देण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक दृष्टीने विचार करेल. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी ही प्रशासनाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. जनतेच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एका व्यापक भूमिकेतून आपण सगळयांनी अधिक पारदर्शक व गतिमान कार्यपध्दतीचा स्वीकार केला पाहिजे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्याचा सर्वांगीण विकास साधताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी राज्यात सर्वत्र काम करण्याची व्यापक मानसिकता जोपासली पाहिजे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
जनतेच्या शासन प्रशासनाकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेता शासकीय कामाकाजातील दिरंगाई  टाळून सामान्य माणसांचे प्रश्न तात्काळ सोडविणे आवश्यक आहे.  या सकारात्मक भूमिकेतून प्रशासनाने पारदर्शकरित्या काम करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
याप्रसंगी उत्तम कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये वासुदेव भगत, जळगांव; विलास गावडे, कोकण भवन; शशिकांत घोरपडे, बांद्रा ; योगेश गोडसे, पुणे; दिलीप हळदे, कोकण भवन; जितेंद्र इंगळे, अमरावती; दिलीप जोखे, पुणे; विष्णू कांबळे, उस्मानाबाद ; डॉ. संपत खिलारी, कोल्हापूर ; डॉ. अशोक नांदापूरकर, ठाणे ; इंजि. के. पी. पाटील, अंधेरी ; श्री. श्रीकांत पाटील, मंत्रालय; 
डॉ. उज्ज्वला अविनाश पाटील, बुलढाणा
; डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, मंत्रालय ; डॉ. प्रमोद रक्षमवार, नागपूर ; आर.सी. शहा, ठाणे; साहेबराव साळुंखे, ठाणे; इंजि. अरुण सरागे, यवतमाळ ;  श्रीमती नसीमा मकसुद शेख, मंत्रालय ; बाबासाहेब शिंदे, अहमदनगर; रवींद्र शिंदे, ठाणे ; इंजि. सितल चंद्रशेखर सेवतकर, पुणे ; विलास ठाकूर, अमरावती ; श्रीमती सरोज दत्तात्रय थोरात- महाबोले, नाशिक ; डॉ. श्रीकांत तोडकर, मुंबई; बी.एम. टोपे, पुणे ; मोहन वर्दे, मुंबई यांना गौरविण्यात आले तर संस्थापक व उत्तम सल्लागार कार्यकर्ते बी.डी. शिंदे, वरिष्ठ अपर जिल्हाधिकारी, बि.गो. चिकोडे, सहाय्यक कामगार आयुक्त यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा