सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

आता माहिती अधिकारही ‘ई-सुविधे’द्वारे वापरता येणार : मुख्यमंत्री
मुंबई, दि. २९ : प्रशासनातील पारदर्शकतेच्या दृष्टीने माहिती अधिकाराखालील उपलब्ध असलेली माहिती नागरिकांना ई- सेवेद्वारे उपलब्ध करुन देण्याची सुविधा लवकरच सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 ‘एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचे पाच वर्षांचे व्हिजन सविस्तर विशद केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या धर्तीवर डिजिटल महाराष्ट्र हे अभियान आपण सुरु केले आहे.  शासनाच्या सर्व सेवा  माझं सरकार या वेबपोर्टलद्वारे उपलब्ध करुन देण्यात येतील, त्याचबरोबर नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा - सेवेच्या माध्यमातून देणे अनिवार्य करण्यात येईल.  सुविधा कधीपासून सुरु करावयाची याची तारीखही महिनाभरात जाहीर करण्यात येईल.
नगरविकासासंदर्भात ते म्हणाले की, राज्यातील निम्मी लोकसंख्या शहरांमध्ये राहते. वाढत्या नागरीकरणामुळे काही प्रश्नही निर्माण होतात. विकास आराखडे वेळेवर मंजूर झाले तर बेकायदा बांधकामासांरखे प्रश्न निर्माण होत नाहीत. मात्र राज्यातील पंचवीस शहरांचे विकास आराखडे शासन स्तरावर प्रलंबित होते.त्या सर्वांचा अभ्यास करुन आमच्या सरकारने पंधरा दिवसांतच त्यांना मंजरी दिली. आता पुणे आणि कल्याण या दोनच शहरांचे आराखडे प्रलंबित आहेत. त्यापैकी कल्याणचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येईल.  पुणे शहर विकास आराखड्यासंदर्भात संबंधितांचे मतक्य घडवून तोही मार्गी लावण्यात येईल, असे ते म्हणाले.
 मुख्यमंत्री  म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे शेती क्षेत्रासमोर संकट उभे आहे, त्यामुळे शाश्वत शेती हा अत्यंत महत्वाचा विषय बनला आहे. शाश्वत शेतीसाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शिवारातील पाणी शिवारातच कसे जिरवता येईल  , सोबतच विकेंद्रीत पाणीसाठे कसे तयार करता येतील, याकडेही लक्ष देण्यात येईल. एका वर्षात पाच हजार गावे  दुष्काळमुक्त करण्यात येतील. धडक सिंचनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल. शेतीकरिता प्राधान्यांने वीजपुरवठा करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पाच लाख सोलर पंप घेण्यात येणार असून त्यातून सिंचनाची व्यवस्था करता येईल. ऊसासाठी सुक्ष्म सिंचनाचा वापर केला पाहिजे त्यादृष्टीने सरकार, साखर कारखाने व शेतकरी  यांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
पिक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढणे गरजेचे असून  वातावरणातील बदलानुसार मंडळनिहाय स्वंयचलीत हवामान केंद्राची उभारणी करण्यात येईल.  प्रत्येक गावातही हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हवामान बदलाचा अंदाज येईल कसानीची पातळी कमी करणे शक्य होईल. असे सांगतानाच उद्योगक्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येणार असून मुंबईत उद्योगवाढीसाठी  प्रयत्न करण्यात येतीलशिक्षणात गुणवत्ता यायला पाहिजे . गरजेप्रमाणे अभ्यासक्रमाची निर्मितीही आवश्यक असून महाविद्यालयांना स्वायत्तता दिली तर त्यातून शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होईल.  मानसिकता सकारात्मक असेल तर निश्चितच मार्ग मिळतो. सशक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करु, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
00000
         




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा