शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१३


रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरांनी घेतली मख्यमंत्र्यांची भेट
सहकार, उद्योग क्षेत्राच्या मदतीसाठी
बँकिंग क्षेत्राने पुढे यावे : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 6 : आर्थिक मंदीचे वातावरण लक्षात घेता राज्यातील सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी, तसेच रोजगार निर्मितीसाठी लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी बँकिंग क्षेत्राने पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष रघुराम राजन यांनी आज श्री. चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
          श्री. चव्हाण आणि श्री. राजन यांची विविध विषयांवर सुमारे एक तास चर्चा झाली. जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम देशाबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. मात्र त्याचा फटका राज्यातील उद्योगांना आणि विकास कामांना बसु नये, यासाठी बँकिंग क्षेत्राने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मत श्री. चव्हाण यांनी व्यक्त केले. मंदीच्या काळात रोजगारावर विपरित परिणाम होतो. म्हणुन रोजगार निर्मितीच्यादृष्टीने विशेषत: मध्यम आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले.

पायाभूत सुविधा प्रकल्पांचे आर्थिक नियोजन सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी बँकिंग क्षेत्राकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली. राज्याला टंचाईमूक्त करण्यासाठी राज्य सरकारने योजलेल्या उपायांची माहितीही श्री. चव्हाण यांनी त्यांना दिली. विकेंद्रीत पाणीसाठा हा यावरचा महत्वाचा उपाय असल्याने शेवटच्या टप्प्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर राहील, असेही ते म्हणाले. श्री. चव्हाण यांनी श्री. राजन यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा