रविवार, ९ जून, २०१३

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी 60 हजार कोटींची
योजना राबविण्याचा मानस -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
राज्यातील 1423 बंधाऱ्यांचे एकाच दिवशी राज्यस्तरीय लोकार्पण
सातारा, दि.9  :-  महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून आगामी तीन वर्षात पाणी या विषयावर जलसिंचन, जलसंधारण आदी उपाययोजनांसाठी 60 हजार कोटींची योजना राबविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
राज्यातील दुष्काळ पाणीटंचाई कायमस्वरुपी संपविण्यासाठी राज्यातील 6 जिल्हयांतील 15 तालुक्यातील 474 गावात  बांधलेल्या 1 हजार 423 सिमेंट नालाबांध बंधा-याचे राज्यस्तरीय लोकार्पणाचा शुभारंभ गोंदवले येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज रोजगार हमी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.   त्यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, जलसंधारणाचे प्रधान सचिव व्हि. गिरीराज, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार सदाशिवराव पोळ, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., कोल्हापूरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. एन. टी. शिसोदे, प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा आदी मान्यवर उपस्थित होते.
दुष्काळ निवारणासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यास राज्यशासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्य शासनाने आगामी तीन वर्षात दुष्काळाच्या समुळ उच्चाटनासाठी 60 हजार कोटीच्या योजनेचे पंतप्रधानांकडे सादरीकरण केले आहे.  राज्याच्या अर्थसंकल्पातील दरवर्षी 25 टक्के निधी पाण्यासाठी राखून ठेवण्यात येणार आहे.  त्यानुसार प्रतिवर्षी राज्याचे 10 ते 12 हजार कोटी तीन वर्षाासाठी उर्वरीत 30 हजार कोटी केंद्राकडून उपलब्ध करुन घेतले जातील.  या योजनेमध्ये जलसिंचन आणि जलसंधारणाबरोबरच बंधारे, शेततळी, पाझर तलावनिर्मिती दुरुस्ती, खोलीकरण, गाळ काढणे, वृक्षारोपन, शहरी भागातील नळ पाणी योजनांना मिटर सक्ती, ऊस पीकांसाठी 100 टक्के ठिबक सिंचन या बाबींचाही समावेश केला जाईल. याशिवाय मोठ्या शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते उद्योगांना विकत देण्याची योजनाही आगामी काळात राबविण्यात येईल, असेही ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  या योजनेसंबधी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री आणि आपण स्वत: पंतप्रधान महोदयांची भेट घेऊन या योजनेचा प्रस्ताव दिला असल्याचे ते म्हणाले. 
राज्यात दुष्काळ निर्मुलनासाठी आगामी काळात एक हजार कोटीचा सिमेंट नालाबांधाचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात गेल्या दोन वर्षात उद्भवलेला दुष्काळ आपत्ती मानता संधी मानून सिमेंट बंधाऱ्यंाचा मोठा कार्यक्रम राज्याने राबविल्यामुळे  त्याची यशस्विता पाहून नियोजन आयोगाने राज्याला 500 कोटी रुपये सिमेंट बंधाऱ्यांसाठी दिले आहेत.  तसेच सिमेंट बंधाऱ्यासाठी  मुख्यमंत्री फंडातून 120 कोटी, तसेच खासदार आमदाराचा स्थानिक विकास निधी आणि जलसंधारणाच्या कार्यक्रमातून एकत्रितरित्या 1 हजार कोटींचा निधी जमविला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात दुष्काळ निवारणासाठी घेतलेले 1 हजार 423 बंधा-यांचे आज एकाच दिवशी एकाच वेळी लोकार्पण होत असून हे एक ऐतिहासिक काम असून याची इतिहासात नोंद घ्यावी लागेल असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील 6 जिल्हयात 15 तालुक्यांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी सिमेंट बंधाऱ्यासाठी दिला होता.  सातारा जिल्हयात पहिल्या टप्यात माण खटाव तालुक्यातील 51 गावातील पूर्ण करण्यात आलेल्या 3.232 दशलक्ष घन मीटर पाणीसाठवण क्षमता असलेल्या एकूण 213 साखळी सिमेंट बंधा-यांचे लोकार्पण करण्यात आले.  सिमेंट नालाबांध बांधकामामुळे 4 हेक्टर जमीन ओलिताखाली येते  एका वेळी 10 हजार घन मीटर पाणीसाठी होतो. सिमेंट नालाबांधमुळे जवळील विहीरी आवर्धीत होऊन त्यांचा फायदा स्थानिक लोकांना जनावरांना होईल.  पुणे विभागात जलयुक्त गाव अभियानांतर्गत पुणे, सातारा, सोलापूर सांगली या चार जिल्हयात प्रचंड असा जनसहभाग लाभल्याने पाझर तलाव, गाव तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा उपक्रम घेतल्याने सुमारे 8.5 टीएमसी पाणीसाठा निर्माण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दुष्काळामध्ये राज्य शासन सर्व सामान्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांतर्गत 5.5 हजार टँकरने 11 हजार गावे-वाडयांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.   जनावरांच्या 1 हजार 300 छावण्यांतून 9 लाख जनावरांची जोपासना केली जात आहे.  सध्या साडेचार लाख माणसांना रोजगार हमी योजनेवर काम दिले असून यावर गतवर्षी 1 हजार 500 कोटी तर या वर्षी 2 हजार 300 कोटी खर्च झाला आहे.  टँकर छावण्यांवर 2 हजार कोटींचा खर्च    झाला असून याप्रमाणे एकूण 5 हजार कोटींवर खर्च होऊनही ठोस काम उभे राहिले नाही.   त्यामुळे जलसंधारणाच्या उपाययोजना हाती घेण्याचे महत्व लक्षात आले आहे असेही ते म्हणाले.   
केवळ जलसंवर्धन करुन थांबता कामा नये असे आवाहन करुन पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, या वर्षी हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज वर्तविला असला तरी दरवर्षीच समाधानकारक पाऊस होईल असे नाही.  दुष्काळी तालुक्यात निर्माण केलेल्या साखळी बंधारे, पाझर तलाव यामध्ये मोठया धरणप्रकल्पातील पाणी कमी पावसाच्या कालावधीत सोडण्यासाठी जलसंपदा जलसंधारण विभागाच्या समन्वयातून योजना तयार करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. 
दुष्काळाशी सामना करण्याचे एक प्रभावी माध्यम साखळी बंधाऱ्याच्या रुपाने आपल्या हाती आल्याचे सांगून जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा असूड या ग्रंथातून धरणे, जलसंधारण उपाययोजनांची गरज मांडली होती.   छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात या उपाययोजना राबविल्या होत्या.  सातारा जिल्हयाने हा पथदर्शी प्रकल्प प्रथम राबवून त्याच्या यशस्वीतेतून संपूर्ण राज्यात 6 जिल्हयांत 15 तालुक्यात प्रकल्प राबविला.  यापुढील काळात 2 हजार 800 कोटी खर्च करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सघन सिंचन कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रास्ताविक केले.  प्रधान सचिव व्ही. गीरीराज, आमदार जयकुमार गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमात राज्यातील साखळी सिमेंट नाला बांध लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने तयार करण्यात आलेले माहितीपुस्तक तसेच सातारा जिल्ह्यातील सुवर्ण जयंती राजस्व अभियानासंदर्भातील झेप पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी सभापती किरण साबळे पाटील, समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके, महिला बालकल्याण सभापती नीलम पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम, निवासी उपजिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, प्रांताधिकारी धनाजी पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे आदींसह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000


1 टिप्पणी: