मंगळवार, २३ एप्रिल, २०१३


महाराष्ट्राच्या विकासात जैन समाजाचे योगदान महत्वपूर्ण - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 23 : जैन समाज उद्योग तसेच शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असून जैन समाजाने महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि समृध्दीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या भगवान महावीर यांच्या 2612 व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान, आमदार चरणसिंग सप्रा, आमदार मनिष जैन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशाला एकसंघ आणि अखंड ठेवण्यासाठी सामाजिक समभाव, बंधूभाव, सर्वधर्म समभाव वृद्धींगत होणे आवश्यक आहे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. दुष्काळ सहाय्यता निधीसाठी उत्स्फूर्तपणे मदत दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाबरोबरच समाजातील घटकाने या कामात पुढे यावे.
नसीम खान म्हणाले, महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. समाजामध्ये सद्‌भावना, एकता, बंधुभाव वाढीस लागावा यासाठी भगवान महावीर यांच्या अहिंसेच्या संदेशाचे आचरण करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने प्रत्येक ग्राम पंचायतीत दहा लाख रुपये तेथील अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मंजूर केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या जैन समाजातील व्यक्तींना याप्रसंगी  मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते जैन समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार जनार्दन चांदूरकर तसेच जैन समाजातील शांतीलाल मारु, सुभाष रुवाल, पृथ्वीराज कोठारी, कनकराज लोढा, सुनकीलाल कर्नावट आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा