रविवार, २४ मार्च, २०१३

 साखर उद्योगाला सक्षम करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज - मुख्यमंत्री
कोल्हापूर दि. 24 : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणींवर मात केल्याशिवाय शेतकरी, सभासद, कामगार आणि साखर उद्योगाचे हित जोपासले जाणार नाही. त्यामुळे साखर उद्योग सक्षम करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
          नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने दिला जाणारा 'समाज वैभव' पुरस्कार आमदार सा. रे. पाटील यांना शिरोळ येथे मुख्यमंत्री  श्री. चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, सहकार चळवळीत महाराष्ट्राने देशासमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे ही चळवळ अधिक बळकट करुन ग्रामीण भागाचे जीवनमान उंचावणे आपली जबाबदारी आहे. राज्यात भीषण दुष्काळ असून दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. परंतु निसर्गाची अवकृपा पाहता यापुढे पाण्याच्या वापराचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी ऊस उत्पादकांनी 100 टक्के ठिबक सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच तीन वर्षात संपूर्ण ऊस शेती ठिबक सिंचनाखाली आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
          मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, नव्या औद्योगिक धोरणाचा वापर करुन विकास साधा. जागतिक मंदीची लाट आपल्याही देशात असून त्याचा परिणाम आपल्या राज्यावर होत आहे. सहकारी साखर कारखान्यांना इन्कमटॅक्स  मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण, क्षेत्रात बहुमोल योगदान आमदार सा. रे. पाटील यांनी दिले असल्याचे सांगून सच्चा सामाजिक कार्यकर्ता अशा शब्दात आमदार सा.रे. पाटील यांचा मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी गौरव केला.
          पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, कामगारांचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. शेतकरी, कामगार, साखर उद्योगाला बळकट करणे काळाची गरज आहे. शेतकरी, कामगार आणि उपेक्षितांची अवितरत सेवा करणारे नेते म्हणून आमदार सा. रे. पाटील यांची ओळख आहे. त्यांचा हा सन्मान सर्वांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले.
          महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, सहकार चळवळ रुजविण्यास आमदार सा. रे. पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. कामगारांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. महात्मा गांधी आणि मार्क्स यांच्या विचारांचा मिलाफ म्हणजे आमदार पाटील अशा शब्दांत महसूल मंत्री श्री. थोरात यांनी आमदार पाटील यांचा गौरव केला.

          ग्रामविकास मंत्री जयंत पाटील म्हणाले, दत्त सहकारी साखर कारखान्याने नेहमीच आदर्श काम केले आहे. राज्यात उत्तम दर्जाचा साखर उद्योग शिरोळ परिसरात आहे. शेतकरी मालक झाला पाहिजे म्हणून सहकाराची चळवळ सुरु झाली. त्याच विचाराने आमदार सा. रे. पाटील यांनी ही चळवळ रुजविली. त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान अनन्य साधारण आहे.
          यावेळी आमदार सा. रे. पाटील, ऍ़ड. के.डी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केले. तर प्रास्ताविक पुरस्कार समितीचे चेअरमन बी. आर. पाटील यांनी केले.
          यावेळी नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने देण्यात येणारा समर्पित कार्यकर्ता पुरस्कार सांगलीचे ऍ़ड. के.डी. शिंदे आणि पुण्याचे कैलास कदम यांना प्रदान करण्यात आला.  तसेच स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्त शेतकारी सहकारी साखर कारखाना, संलग्न संस्था आणि कर्मचारी यांच्यावतीने दुष्काळी भागासाठी एक कोटी 55 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांकडे आमदार सा. रे. पाटील यांनी सुपूर्द केली.
          यावेळी कर्नाटकचे आमदार काका पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार पी. एन. पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, दैनिक तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर, प्रतिष्ठाने पदाधिकारी, दत्त कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा