रविवार, ३१ मार्च, २०१३

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन
देण्यासाठी विशेष प्रयत्न - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 31:  मोठ्या  शहराची मक्तेदारी संपवून सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर खेळाडू पुढे येत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या क्रीडा धोरणातंर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत  आहेत. विशेषत: अपंग खेळाडूंसाठी  खास सोयी-सुविधा दिल्या जात असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  आज येथे केले.
            ऑल इंडिया  क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजीकली चॅलेंज्ड  या संघटनेच्या वतीने आयोजित अपंगांसाठीच्या राष्ट्रीय रौप्य महोत्सवी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईतील पोलीस जिमखान्याच्या मैदानावर झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अजित वाडेकर, एल.आय.सी.चे अध्यक्ष डी.के. मेहरोत्रा, एस.बी.आय.चे मुख्य महाव्यवस्थापक जे.एन. मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
            
मुख्यमंत्री म्हणाले, खेळताना जात, धर्म, रंग, भेद या भावना बाजूला ठेवून खेळाडू केवळ भारतीय म्हणूनच खेळत असतो. ही खिलाडू वृत्ती त्यांना आयुष्यभर उपयोगी ठरते. अपंग खेळाडू शारिरीक अडचणींवर मात करुन कौशल्य दाखवीत आहेत. याच खिलाडूवृत्तीतून बळ मिळवून ते आयुष्यातील अडचणीवरही सहजतेने मात करु शकतील. भारतीय क्रिकेट बोर्ड सर्वात श्रीमंत समजले जाते. त्यांनी क्रिकेटमधील सर्व प्रकाराच्या उन्नतीसाठी मदत करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
            राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई असून त्यावर मात करण्यासाठी शासनामार्फत सर्व ते प्रयत्न केले जात   आहेत. या कामी सर्वांनी आपआपल्या परीने हातभार लावावा, असे  आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
            मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यक्षीय संघ आणि पश्चिम विभाग यांच्यातील सामन्याचे नाणेफेक करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अजित वाडेकर यांनी प्रास्ताविकाद्वारे संघटनेच्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. तर संघटनेचे सचिव टी.पी. मिरजकर यांनी खेळाडूंना  खेळभावनेची शपथ दिली.
            यावेळी स्पर्धेचे प्रायोजक, मुंबई क्रिकेट असोशिएशन आणि ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजीकली चॅलेंज्ड चे पदाधिकारी,  खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा