गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२




पर्यटक सुविधेसाठी मुंबईत
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ टर्मिनल उभारणार
                                    - मुख्यमंत्री

        मुंबई, दि. 30 : देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असलेल्या मुंबई हजारो पर्यटक दरवर्षी भेट घेतात. त्यामुळे मुंबईत पर्यटकांच्या सुविधेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ टर्मिनल उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली. इंडियन असोसिएशन ऑफ टुर ऑपरेटर्सच्या 28 व्या वार्षिक संमेलनात ते उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते.
        सीपीएच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला पर्यटन तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री रणजित कांबळे, बिहारचे पर्यटन राज्यमंत्री सुनीलकुमार पिंटो, पश्चिम बंगालचे पर्यटन राज्यमंत्री रजपाल सिंह, असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष गोयल, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदिश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
        मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले, मुंबई हे बॉलिवूड क्षेत्रातही महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथे भेट देणाऱ्या विशेषत: ऑस्ट्रेलिया, थायलँड, सिंगापूर, मलेशिया, दुबई आदी देशातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात लक्झरी क्रुझने पर्यटक येतात. मात्र त्यांना मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ टर्मिनल नसल्याने त्यांना योग्य सुविधा  उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पर्यटकांसाठी सोयीसाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रुझ उभारले जाईल त्याची पर्यटन विकासास निश्चितच मदत होईल. महाराष्ट्र राज्य देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. मेक्सीको देशाएवढे हे राज्य आहे. मोठे राज्य असल्यामुळे येथील बाजारपेठे देखील मोठे आहे त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. त्या मिळविण्यासाठी आपण पुढे यावे. महाराष्ट्र शासन त्यासाठी एक पाऊल पुढे टाकेल. तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध परवानग्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली जाईल कारण पर्यटनक्षेत्र हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.2006 च्या पर्यटन धोणाचा आढावा घेऊन त्यातील घोषणांनुसार पर्यटन विकासाची कामे केली जातील, असेही ते म्हणाले.
        जगामध्ये असलेली सर्व प्रकारची पर्यटन स्थळे भारतामध्ये असून त्यातील बहतांश पर्यटन स्थळे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात हिमालय पर्वत सोडला तर सर्वकाही आहे अशा शब्दात पर्यटन तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन संपत्तीची महती सांगितली. तसेच महाराष्ट्रात अंतर्गत पर्यटन स्थळांच्या प्रवासासाठी सर्वत्र चौपदरी रस्ता झाला हे महत्त्वाचे काम झाले आहे. राज्यातील 800 घरांमध्ये पर्यटकांसाठी निवास, न्याहरी व्यवस्था असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे विमानतळ व हेलीपॅड देखील उपलब्ध असून पर्यटकांनी त्याचा लाभ घ्यावा. या असोसिएशनने एकत्र येऊन संवाद साधावा व त्याद्वारे जगातील पर्यटकांना महाराष्ट्रात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
        पर्यटन राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत करुन महाराष्ट्राच्या विविध पर्यटन योजनांची माहिती दिली. तसेच बिहारचे पर्यटन राज्य मंत्री श्री. पिंटो व पश्चिम बंगालचे पर्यटन राज्यमंत्री श्री. सिंह यांनी देखील आपापल्या प्रांतातील पर्यटन विषयी माहिती सांगितली.  तसेच मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांनीही सर्वांचे स्वागत करुन पर्यटन विकासासाठी शासन करीत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
        आपल्या प्रास्ताविकातून संघटनेचे अध्यक्ष सुभाष गोयल यांनी पर्यटन विकासासाठी महाराष्ट्राकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या व महाराष्ट्राचे आभार मानले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असोसिएशनचे विविध पुरस्कार देण्यात आले व पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. या संमेलनाचे सहआयोजक हे महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ असून संमेलन 2 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा