शनिवार, २८ जानेवारी, २०१२


महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यालयावरील हल्ल्याचा
मुख्यमंत्र्यांकडून तीव्र निषेध

मुंबई.दि. २८ महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यालयावर आज दुपारी करण्यात आलेल्या हल्ल्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच तोडफोड करणाऱ्या या हल्लेखोरांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
लोकशाहीमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा हक्क सगळ्यांना आहे. वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्याविषयी एखाद्या राजकीय पक्षास आक्षेप असेल तर संपादकांशी बोलून किंवा अन्य लोकशाही मार्गाने त्यांना ती बाजू मांडता येऊन शकते, मात्र महाराष्ट्र टाईम्स सारख्या वृत्तपत्राच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात घुसून सामानांची तोडफोड करणे, वृत्तपत्रे जाळणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. विशेषत: मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर असणाऱ्या पक्षाचा आत्मविश्वास ढळला असल्याचे हे लक्षण आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
हल्ला करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा असे निर्देशही त्यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा