मंगळवार, ३ जून, २०१४

गोपीनाथ मुंडे हे राजकारणाच्याही पलिकडे जाऊन
लोकांसाठी काम करणारे नेतृत्व : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 3 : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री श्री. गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन हे अतिशय धक्कादायक आणि चटका लावुन जाणारे आहे. अथक संघर्ष करुन त्यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केलं होतं. राजकारणाच्याही पलिकडे जाऊन लोकांसाठी काम करणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री. मुंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
श्री. चव्हाण शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्रातील खंबीर आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ख्याती असलेल्या केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे आकस्मिक निधन अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्युने महाराष्ट्र एका अष्टावधानी नेतृत्वाला आणि एक संवेदनशील लोकसेवकाला मुकला आहे. जिल्हा परिषद गटातील कार्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास सातत्यपूर्ण लोकसेवा आणि लोकसंग्रहाच्या बळावर केंद्रीय मंत्रीपदापर्यंत विस्तारला गेला. लोकसभा सदस्य म्हणून देखील त्यांची कामगिरी सरस अशीच झाली. याचाच परिणाम म्हणून कार्यकर्तृत्वाच्या बळावर त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रीमंडळात करण्यात आला.
स्व. मुंडे यांची मुळ ओळख एक प्रभावी वक्ता आणि तळागाळातील कार्यकर्त्याशी जोडला गेलेला नेता अशी आहे. ग्रामीण जनतेच्या प्रश्नांशी त्यांनी सातत्याने स्वत:ला जोडले आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. आपल्या खुमासदार शैलीत जनतेशी संवाद साधतांना याच शैलीने त्यांनी विरोधकांवर तेवढेच कठोर प्रहारही केले. तत्वाला किंवा एखाद्या निर्णयाला विरोध करताना मात्र वैयक्तिक पातळीवर अत्यंत दिलखुलासपणे माणसे जोडण्याची खुबी त्यांच्यात होती.
अतिशय विनम्र स्वभाव हा त्यांचा गुण सर्वांनीच घेण्यासारखा आहे. त्यांच्या निधनाने केवळ मराठवाड्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे नुकसान झाले आहे. आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार या पदांच्या माध्यमातुन त्यांनी महाराष्ट्राच्या हिताची अनेक कामं केली. केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसात मृत्युनं त्यांना अशा भयानक आणि निर्दयी प्रकारे गाठावं, हे अतिशय क्लेशकारक आहे, असे श्री. चव्हाण म्हणतात.
-0-0-0

रविवार, १ जून, २०१४

आज सकाळी राजभवन येथे होणार
शपथविधी : दोन मंत्र्यांचा समावेश

मुंबई, दि. १ जून : उद्या सोमवारी (२ जून) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राजभवन येथे सकाळी साडेनऊ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन दोन मंत्र्याना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी रात्री राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना शपथविधी समारंभ आयोजित करण्याबाबत पत्र सादर केले. 
मंत्रिमंडळ निर्णय, दि.  १ जून २०१४.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव वाहतूक भत्ता
राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2014 पासून वाढीव दराने वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
5400 रूपये किंवा त्याहून अधिक ग्रेड पे असलेल्या कर्मचाऱ्यांना अ-1 व अ वर्ग शहरांसाठी 2 हजार 400 रूपये तर इतर ठिकाणांसाठी 1 हजार 200 रूपये दरमहा देण्यात येतील. ग्रेड पे 4400 ते 5400 रूपये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अ-1  व  अ  वर्ग शहरांसाठी   1 हजार 200 रूपये तर इतर ठिकाणांसाठी 600 रूपये व 4400 पेक्षा कमी ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व शहरांसाठी 400 रूपये असा वाहतूक भत्ता देण्यात येईल.
अपंग कर्मचाऱ्यांसाठी दुप्पट वाहतूक भत्ता
अंध, अस्थिव्यंग आणि पाठीच्या कण्याच्या विकाराने पिडीत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खालील प्रमाणे वाढीव वाहतूक भत्ता देण्यात येईल.
5400 रूपये किंवा त्याहून अधिक ग्रेड पे असलेल्या कर्मचाऱ्यांना अ-1 व अ वर्ग शहरांसाठी 4 हजार 800 रूपये तर इतर ठिकाणांसाठी 2 हजार 400 रूपये दरमहा देण्यात येतील. ग्रेड पे 4400 ते 5400 रूपये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अ-1 व अ वर्ग शहरांसाठी      2 हजार 400 रूपये तर इतर ठिकाणांसाठी 2000 रूपये व 4400 पेक्षा कमी ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व शहरांसाठी 2000 रूपये असा वाहतूक भत्ता देण्यात येईल.
00000
80 वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना दहा टक्के वाढ
80 वर्षावरील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या मुळ निवृत्ती वेतनात 1 एप्रिल 2014 पासून 10 टक्के वाढ करण्याचा ‍निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ राज्य शासन, जिल्हा परिषद तसेच कृषी आणि कृषीतर शैक्षणिक संस्थांतून निवृत्त झालेल्या सुमारे एक लाख सेवानिवृत्तीधारकांना होणार आहे.
सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने ही अतिरिक्त वाढ मंजूर करण्यात आली आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या संघटनांकडून वारंवार शासनाकडे याबाबत मागणी करण्यात येत होती. वाढती महागाई व वृद्धत्वामुळे आजारपणावर होणारा वैद्यकीय खर्च लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यावर अंदाजे 10 कोटी रूपये एवढा अतिरिक्त मासिक भार पडेल.
00000
शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग
कायम कामगारांना देखील समकक्ष वेतनश्रेणी लागू
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या स्थायी अधिकारी, कर्मचारी व कामगारांना 1 जानेवारी 1996 पासून पाचवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे वाढीव वेतन 1 जानेवारी 2008 पासून देण्यात येतील. या निर्णयाचा लाभ 815 अधिकारी, कर्मचारी व कामगारांना मिळेल.
सध्या महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौथ्या वेतन आयोगानुसार वेतन व भत्ते दिले जातात. वर्ष 2008 पासूनची फरकाची रक्कम 16 कोटी 72 लाख असून यापुढे 2 कोटी 13 लाख वार्षिक अतिरिक्त खर्च येईल. हा खर्च महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ स्वत:च्या  उत्पन्नातून भागविणार आहे.
00000