बुधवार, १६ जानेवारी, २०१३



मंत्रिमंडळ निर्णय
16 जानेवारी 2013
(मंत्रिमंडळ बैठक क्र.104)


क्र.
विषय
विभाग

1
ग्रामीण भागातील एक पडदा चित्रपटगृहांना
5 आणि 7 वर्षांसाठी संपूर्ण करमणूक शुल्क माफ
महसूल
2
दूध उत्पादन वाढविण्यासाठी दुभत्या संकरित गाई-म्हशींचे
वाटप करण्यास मान्यता.
पशुसंवर्धन
3
पशुसंवर्धन विभागाच्या योजना प्रभावीरित्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार.
पशुसंवर्धन

4
दूध उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक योजना राबविणार.
पशुसंवर्धन
5
महावितरणच्या  पायाभूत आराखडा प्रकल्पास मान्यता 2016 पर्यंत 31 लाख नव्या विद्युत जोडण्या.
ऊर्जा
6
वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालातील शिफारशी लागू करण्यास मान्यता.
वित्त

7
राज्यातील धरणांमध्ये 48 टक्के पाणी साठा टँकर्सच्या संख्येत वाढ
मदत व पुनर्वसन


ग्रामीण भागातील एक पडदा चित्रपटगृहांना
5 आणि 7 वर्षांसाठी संपूर्ण करमणूक शुल्क माफ
            राज्यातील अ, ब ,व क वर्ग नगरपरिषदांच्या क्षेत्रासाठी 5 वर्षे आणि ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील एक पडदा चित्रपटगृहांना 7 वर्षासाठी संपूर्ण करमणूक शुल्क माफी करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
            राज्यात सध्या 549 एक पडदा चित्रपटगृहे असून, त्यातील 80 ते 100 चित्रपटगृहे ग्रामीण भागात आहेत. ग्रामीण भागात चित्रपटांना प्रेक्षकांना पुरेसा प्रतिसाद नसल्याने या ठिकाणी या व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मराठी चित्रपटांना व्यवसाय मिळण्यासाठी बहुविध चित्रपटगृहे आणि एक पडदा चित्रपटगृहात प्रवेश शुल्काच्या दरात कमाल मर्यादा निश्चित केली तर राज्यातील सर्व दर्जाच्या प्रेक्षकांना मराठी चित्रपट पाहण्याकरीता जास्त दर देणे आवश्यक राहणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उपस्थिती वाढेल. एक पडदा चित्रपटगृहांनी करमणूक शुल्क माफीच्या दरम्यान अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणावे व पुनर्बांधणी करावी, जेणेकरुन प्रेक्षकांना मिळणारा करमणूकीचा दर्जा सुधारेल.
            राज्यातील चित्रपटगृहांमध्ये 2 केडीसीआय (डिजिटल सिनेमा) प्रक्षेपण यंत्रणा वापरणाऱ्या चित्रपटगृहांना 4 रुपये एवढे सेवाशुल्क आकारण्यास तसेच डिसीआय (उपग्रहावर आधारीत) प्रक्षेपण यंत्रणा वापरणाऱ्या चित्रपटगृहांना 2 रुपये अतिरिक्त सेवाशुल्क आकारण्यास मुभा देण्यात आली आहे.राज्यातील फिरत्या चित्रपटगृहांकरिता 1 रुपये इतके सेवाशुल्क आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. फिरते चित्रपटगृहे वगळता उर्वरित चित्रपटगृहाना उपग्रहाद्वारे संगणकीकृत तिकीट प्रणाली अनिवार्य करण्यात आली असून अशा चित्रपटगृहांना 1 रुपये एवढे सेवाशुल्क आकारता येईल.
            मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपटगृह चालकानी मराठी चित्रपट प्राईम टाईम मध्ये प्रदर्शित केल्यास त्यांना 2 रुपये एवढे अतिरिक्त सेवाशुल्क आकारण्याची मुभा देण्यात येईल. बहुविध चित्रपटगृह संकुलामध्ये कमाल 200 रुपये व एक पडदा चित्रपटगृहांमध्ये कमाल 100 रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क अनिवार्य करण्यात येईल.                             -----0-----

दूध उत्पादन वाढविण्यासाठी दुभत्या संकरित गाई-म्हशींचे
वाटप करण्यास मान्यता

राज्यातील 33 जिल्हयात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी सहा दुभत्या संकरित गाई किंवा म्हशीचे गट वाटप करणारी नाविन्यपूर्ण  योजना 12 व्या पंचवार्षिक योजनेत राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
वर्ष 2011-12 मध्ये या योजनेंतर्गत 1503 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला असून त्यांच्या
मासिक उत्पन्नात  9000 रूपये ते 12000 रूपयांपर्यंत वाढ झाली आहे असे निदर्शनास आले आहे.  
2012-13 मध्ये या राज्यस्तरीय योजनेसाठी एकूण 40 कोटी 16 लाख रुपयांचा  निधी उपलब्ध करण्यात आला असून यामधून 2088 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.
चालू वर्षात ही योजना दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार नाही, तसेच जे जिल्हे दुग्धोत्पादनात स्वयंपूर्ण नाहीत अशाच जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
-----0-----

पशुसंवर्धन विभागाच्या योजना प्रभावीरित्या
सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार
शेतकऱ्यांना पशुपालनाची  माहिती प्रभावीपणे व्हावी यासाठी पशुसंवर्धन विस्तार आणि प्रसिध्दी-प्रचार कार्यक्रम या राज्यस्तरीय नवीन योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यासाठी सध्या प्रचलित असलेल्या आकाशवाणी, दूरदर्शन इ. माध्यमाचा  प्रभावीपणे वापर करून दूरचित्रवाहिन्या, आकाशवाणी  केंद्रे, इ. च्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या महत्वाच्या निवडक बाबींना आणि योजनांना ठळकपणे प्रसिध्दी  देण्यात येईल. तसेच पशुसंवर्धन क्षेत्राशी निगडीत घडणाऱ्या उल्लेखनीय घटना, लागणारे विविध  शास्त्रीय शोध, शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त माहिती द्रकश्राव्य माध्यम, छापील साहित्य, इ. द्वारे प्रसिध्द करण्यात येईल. या योजनेत त्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमुळे  शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायाकडे आकर्षित करून त्याद्वारे त्यांच्या विकासास मदत होणार आहे.
                                                  -----0------
दूध उत्पादकता वाढविण्यासाठी
आधुनिक योजना राबविणार
राज्यातील गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात माहिती तंत्रज्ञानाचा देखिल वापर करण्यात येणार आहे.     "राज्यातील गाई-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम'' असे या  राज्यस्तरीय योजनेचे नाव असून ती चालू वर्षापासून राज्यात राबविण्यात येईल. 
या योजनेत जनावरांची ओळख पटविणे नोंद ठेवणे, त्यांच्या उत्पादनाच्या नोंदी ठेऊन त्यांचे विश्लेषण करणे, त्याआधारे प्रत्येक पिढीत उत्कृष्ट जनावरांची निवड करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करण्यात येईल.  या करीता माहिती तंत्रज्ञान आणि संगणक प्रणालीचा वापर करण्यात येईल.
परदेशातून गोठित रेतमात्रा आणणार
या योजनेस व्यापक प्रसिध्दी देवून दुध उत्पादन, वंशावळ, breed characters, दुग्धस्पर्धा इ.च्या आधारे विविध जातीच्या गाई-म्हशींची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अधिकारी, कर्मचारी,  शेतकरी व पशुपालकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड केलेल्या गाई-म्हशींना अतिउच्च अनुवंशीकतेच्या/सिध्द वळूच्या गोठित रेतमात्रेद्वारे कृत्रिम रेतन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार गोठित रेतमात्रा परदेशातून आयात करण्यात येणार आहेत.
वासरांचा संपूर्ण तपशील ठेवणार
कृत्रिम रेतन केल्यानंतर जन्मलेल्या संकरीत कालवडी/सुधारित पारड्या/नर वासरे यांचे जन्मत: वजन, कालवडीचे/पारडीचे माजावर आल्या वेळीचे वय, वजन, कृत्रिम रेतन केल्याची नोंद, तारीख, कालवड व्याल्याची तारीख, दूध उत्पादन, त्यांच्या पितृत्वाच्या मातृत्वाच्या जनुकिय चाचणीचा तपशील तसेच या योजनेंतर्गत पैदास चाचणी कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेल्या नर वासरांचाही तपशील ठेवण्यात येणार आहे.
संगणक आज्ञावली विकसित करणार
पशुपालकांच्या नावांची नोंदणी करणे निवड केलेल्या गाई म्हशींना विशिष्ट ओळख क्रमांक देणे, गाई म्हशीच्या उत्पादक विषयक, अनुवंशिक, स्वास्थ्याचा तपशील, कृत्रिम रेतन, कृत्रिम रेतन केलेल्या वळूंची वंशावळ, गर्भतपासणी इ. नोंदी, इंटरनेट व एसएमएसद्वारे घेण्यासाठी संगणक आज्ञावली (Software) तयार/विकसीत करण्यात येणार आहे.
            गर्भातील वासरांचे योग्य पालनपोषण होवून सुदृढ वासरे जन्मण्यासाठी  गाभण गाई/ म्हशींना विशेष करून गर्भावस्थेच्या शेवटच्या 3 महिन्याच्या कालावधीत पशुखाद्य, क्षारमिश्रणे, विशेष पुरक औषधी (Vit AD3) देण्यात येणार आहे. जन्मलेल्या संकरीत कालवडी/सुधारित पारड्यांची योग्य जोपासना व्हावी, त्या योग्य वयात माजावर याव्यात यासाठी त्यांना Milk replacer, calf starter, calf ration क्षारमिश्रणे देण्यात येईल.
            जन्मलेल्या नर वासरांमधून उत्कृष्ट नर वासरे निवडून त्यांची महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला यांचेद्वारे खरेदी करण्यात येणार असून यामधून पैदास चाचणी कार्यक्रमा करीता उत्कृष्ठ वळूंची निवड करण्यात येणार आहे. पैदास चाचणीत सिध्द झालेल्या वळूंचे वीर्य अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत मोठ्या प्रमाणात उपयोगात आणण्यात येणार आहे.
------0------

महावितरणच्या  पायाभूत आराखडा प्रकल्पास मान्यता
2016 पर्यंत 31 लाख नव्या विद्युत जोडण्या
            महावितरण कंपनीच्या प्रस्तावित पायाभूत आराखडा (इन्फ्रा-2) प्रकल्पास आज मान्यता देण्यात आली.  या प्रकल्पासाठी  6 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार असून 80 टक्के म्हणजे 5 हजार 200 कोटी भागभांडवल महावितरण कंपनी कर्जरुपात उभारेल.  20 टक्के म्हणजे 1300 कोटी रुपये भागभांडवल शासन उपलब्ध करून देणार आहे.
            या प्रकल्पामुळे 2013 ते 2016 पर्यंत अंदाजे 4 लक्ष 88 हजार कृषी पंप ग्राहक, 23 लक्ष 48 हजार घरगुती ग्राहक, 2 लक्ष 64 हजार वाणिज्यिक ग्राहक आणि 58 हजार 200 औद्योगिक ग्राहक असे 31 लाख 58 हजार ग्राहकांना विद्युत जोडण्या देणे शक्य होणार आहे.
-----0-----
वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालातील
शिफारशी लागू करण्यास मान्यता
            वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालातील शिफारशी लागू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या  निर्णयांचा लाभ दि. 1 फेब्रुवारी, 2013 पासून देण्यात येणार आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी, 2006 पासून सुधारित वेतनसंरचना मंजूर केली आहे. या वेतनसंरचनेत त्रुटी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांचे निवारण करण्याकरीता प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने 31 मे, 2012 रोजी शासनास अहवाल सादर केला. या अहवालातील शिफारशींवर मंत्रिमंडळाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतले आहेत.
            विविध विभागांतील सुमारे 60 संवर्गांच्या वेतनसंरचनेत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. साधारणत: 11,000 कर्मचाऱ्यांना वेतन सुधारणेचा लाभ मिळणार आहे. तसेच कामकाजाची जोखीम लक्षात घेऊन पोलीस नाईक, कारागृह हवालदार, अग्निशामक / प्रमुख विमोचक आणि अग्निशामक विमोचक या संवर्गांना विशेष वेतन मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
-----0------

        राज्यातील धरणांमध्ये 48 टक्के पाणी साठा
टँकर्सच्या संख्येत वाढ

जलाशयातील पाणीसाठा
महाराष्ट्रात एकूण 2 हजार 468 प्रकल्प असून यात आज अखेर 48 टक्के एवढा पाणीसाठा आहे.  कोकण विभागात सर्वाधिक म्हणजे 76 टक्के पाणीसाठा तर मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजे 17 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.  नागपुरात 54 टक्के, अमरावती 54 टक्के, नाशिक 40 टक्के, पुणे 52 टक्के एवढा पाणीसाठा आहे. राज्यात पाणी टंचाई असलेल्या 969 गावात 1381 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 
जनावरांच्या छावण्यांवर 214 कोटी 13 लाख रुपये खर्च
राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात 176, उस्मानाबाद जिल्ह्यात 2, पुणे जिल्ह्यात 1, सातारा जिल्ह्यात 89,  सांगली जिल्ह्यात 20 आणि सोलापूर जिल्ह्यात 109 अशा एकूण 395 गुरांच्या छावण्या उघडण्यात आल्या आहेत.  यामध्ये एकूण 3 लाख 35 हजार 569 जनावरे आहेत.  जनावरांच्या छावणीवर आतापर्यंत 223 कोटी 4 लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे. चारा वितरणासाठी एकूण 684 कोटी 29 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.  
महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत राज्यात 18 हजार 907 एवढी कामे सुरु असून या कामांवर 1 लाख 48 हजार 614 एवढी मजूर उपस्थिती आहे. 2012-13 या वर्षातील राज्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली असून त्यात 7 हजार 64 गावातील पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आढळून आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या रब्बी हंगामाच्या हंगामी पैसेवारीत 3 हजार 905 गावातील पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आढळून आली आहे.
------0------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा