मंगळवार, १५ जानेवारी, २०१३


धुळे दंगलीची न्यायालयीन चौकशी - मुख्यमंत्री
          धुळे, दि. 15 :- धुळे  शहरात दि. 6 जानेवारी, 2013 रोजी  झालेल्या दंगलीची  न्यायालयीन चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच एकाही निरपराध व्यक्तीवर कारवाई होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, अशी माहिती धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री  श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिली.
        यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री     श्री. आर. आर. पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि राजशिष्टाचार मंत्री श्री. सुरेश शेट्टी, खासदार श्री. माणिकराव गावीत, आमदार श्री. अमरिशभाई पटेल, आमदार श्री. योगेश भोये, नाशिकचे विभागीय आयुक्त श्री. रवींद्र जाधव, नाशिकचे  विशेष पोलीस महानिरिक्षक श्री. धनंजय कमलाकर, जिल्हाधिकारी श्री. प्रकाश महाजन, पोलीस अधीक्षक श्री. प्रदीप देशपांडे आदि उपस्थित होते.
          मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, सुरुवातीला जरी न्यायदंडाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्याचा  निर्णय घेण्यात आला तरी आता न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ही चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात येईल.  या दंगलीचा अहवाल लवकरात लवकर देण्याची विनंती त्यांना करण्यात येईल.  ही दंगल कोणत्या कारणांमुळे झाली ?  यापुढे दंगल होऊ नये म्हणून करावयाची उपाययोजना,  याबाबतही  चौकशी होईल.  दंगलीत मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारास पाच लाख रुपये, कायमचे अपंगत्व आलेल्यांना 3 लाख रुपये, दंगलीत ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना सन ऑगस्ट-2004 च्या शासन निर्णयाच्या चौपट नुकसान भरपाई देण्यात येईल.  तसेच धुळे शहरात पुन्हा दंगल होऊ नये याकरिता कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्यात करण्यात येतील.  दंगलीची  झळ पोहचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करणार असून यासाठी  जिल्हाधिका-यांनी  याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा.
          दंगलीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने दंगल आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची शासनाने नोंद घेतली आहे.  या दंगलीचा प्रसार शहराच्या इतर भागात होऊ नयेत म्हणून शहरातील नागरिक, समाजसेवी संस्था, प्रसारमाध्यमे आदिंनी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी आभार मानले.                                 
          यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले की, धुळे येथे झालेल्या दंगलीत जळते बोळे फेकून घरे जाळली जात होती.  धुळे व महाराष्ट्राला न परवडणारी ही घटना आहे.   लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे प्रमाण पाहता आझाद नगर पोलीस स्टेशनचे विभाजन करण्यात येईल, असे सांगून त्यांनी दंगलीची अनेक कारणे आहेत त्यात बेकारी आणि गरीबी हेही एक कारण असून त्यावर उपाययोजना म्हणून तरुणांना रोजगार द्यावा लागेल. अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिकेला पोलिसांची मदत दिली जाईल.  शहरात भरवस्तीत बॅटरी उद्योगासाठी लागणा-या ॲसिड व ज्वालाग्रही पदार्थ बाळगणे हानीकारक असल्यामुळे अशा उद्योगांचे स्थलांतर करण्यात येईल, यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
          या पत्रकार परिषदेपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री  श्री. पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री श्री. आर. आर. पाटील, पालकमंत्री सुरेश शेट्टी यांनी सर्व वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिका-यांची बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला तर शासकीय विश्रामगृहात विविध पक्ष, संघटनांच्या, नागरिकांच्या शिष्टमंडळांच्या भेटी घेऊन त्यांची निवेदने स्विकारुन त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा