बुधवार, २३ जुलै, २०१४

मंत्रिमंडळ निर्णय
रायगड जिल्ह्यातील सत्ता प्रकाराच्या
भाडेपट्यांच्या नुतनीकरणाचा मार्ग मोकळा
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, श्रीवर्धन व पेण तालुक्यातील ‘ड’ सत्ता प्रकाराने भाडेपट्टयावर धारण केलेल्या 483 मिळकतींच्या निवासी भाडेपट्टयांचे नुतनीकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  असे भाडेपट्टे सन 1870 ते 1929 च्या दरम्यान देण्यात आलेले होते.  या निर्णयामुळे अशा जुन्या व दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयांचा नुतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘नगरपालिकेने पूर्ण विकलेल्या, परंतु जमिन महसुल भरण्यास पात्र असलेल्या जमिनी’ म्हणजे ‘ड’ सत्ताप्रकाराच्या जमिनी अशी व्याख्या नगर भूमापन नियम पुस्तिकेमध्ये करण्यात आली आहे. ही पुस्तिका ‘अँडरसन मॅन्युअल’ म्हणुन ओळखली जाते.
कर्जत व नेरळ येथील ‘ड’ सत्ता प्रकाराने भाडेपट्टयावर धारण केलेल्या निवासी भाडेपट्यांचे नुतनीकरण करण्याबाबत शासनाने 22 जुलै 2002 मध्ये निर्णय घेतला होता.  तथापि, वरील तालुक्यातील 483 मिळकतीबाबत निर्णय प्रलंबित होता. 
प्रचलित शिघ्रसिध्द  गणकावर (रेडीरेकनर) आधारित प्रचलित बाजारमुल्याच्या 25 टक्के इतकी रक्कम भरल्यास ताबा असणाऱ्या जमिनधारकास भोगवटादार वर्ग-2 या धारणाधिकारावर या जमिनीचा भोगवटा करता येईल.  ज्यांना भाडेपट्टयानेच अशी मिळकत धारण करायची असेल तर अशा बाजारमुल्यावर 0.25 टक्के इतके भुईभाडे भरून 30 वर्षांसाठी भाडेपट्टयाचे नुतनीकरण करता येईल.
मंत्रिमंडळाने असाही निर्णय घेतला की, ज्या भाडेपट्टयामध्ये वापरात अनधिकृतरित्या बदल किंवा विनापरवाना हस्तांतर केले असल्यास असा शेवटचा शर्तभंग विचारात घेऊन आवश्यक ते अनर्जित उत्पन्न आकारून प्रचलित धोरणानुसार नियमित करण्यात येऊन अशा भाडेपट्टयांचे नुतनीकरण करण्यात येईल. ही कार्यवाही क्षेत्रिय स्तरावरच होईल.
-----०-----
शासकीय मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणार
          राज्यातील 29 शासकीय मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी राज्याची नवीन योजना राबविण्याचा  निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही योजना 2014-19 या पाच वर्षांसाठी राबविण्यात येईल. आणि त्यासाठी 17 कोटी 29 लाख एवढा खर्च येईल.
          यापूर्वी 2000 सालापासून या प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यासाठी 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत होती,  ती केंद्र शासनाकडून बंद करण्यात आली आहे म्हणून राज्याची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बळकटीकरण योजनेत मृद विश्लेषणासाठी आवश्यक काचसामान व रसायने खरेदी करण्यात येते.  त्याचप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.  
          शेतकऱ्यांना शेतजमिनीतील मातीचे परिक्षण करून नत्र, स्फुरद, पालाश, तांबे, मंगल, जस्त, लोह इत्यादी अन्नद्रव्ये व मूलद्रव्यांच्या कमतरतेची माहिती मृद विश्लेषणाद्वारे देण्यात येते.  त्यावर खतांचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादनात वाढ होते. 
                                                       -----०-----
राज्यात सरासरीच्या 47 टक्के पाऊस पेरण्यांना जोरात सुरुवात
राज्यात पावसाला सुरुवात झाली असून जुलै महिन्यातील सरासरीच्या 47 टक्के पाऊस (234 मि.मी.) आजपर्यंत झाला आहे.
राज्यातील नाशिक, नंदूरबार, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ या 6 जिल्ह्यात 0 ते 25 टक्के, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, अकोला, वाशिम, भंडारा, चंद्रपूर या 13 जिल्ह्यात 25 ते 50 टक्के, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या 12 जिल्ह्यात 50 ते 75 टक्के आणि सिंधुदुर्ग तसेच सांगली या दोन जिल्ह्यात 75 ते 100 टक्के पाऊस झाला.
धरणात 29 टक्के पाणी साठा
राज्यातील जलाशयात 29 टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 51 टक्के पाणी साठा होता.  राज्यात 1726 टँकर्सद्वारे 1480 गावांना  आणि 3712 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
पेरणी 36 टक्के
राज्यातील खरीपाचे सरासरी क्षेत्र 134.70 लाख हेक्टर असून 23 जुलै पर्यंत 36 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर 2 लाख 32 हजार मजुरांची उपस्थिती आहे.
                                                 -----०-----


शुक्रवार, १८ जुलै, २०१४

पुणे मेट्रो रेल्वेसाठी विशेष हेतू प्राधिकरण
स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
शिवसृष्टी प्रकल्पालाही देणार चालना
        मुंबई, दि.18 : पुणे शहरातील वाढती लोकसंख्या व दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पास गती मिळण्यासाठी विशेष हेतू प्राधिकरणाच्या (स्पेशल पर्पज व्हेईकल-एसपीव्ही) माध्यमातून स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचे आदेश आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्पाचे कामही मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
        पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत आयोजित बैठकीत श्री. चव्हाण यांनी हे आदेश दिले. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती चंचला कोंद्रे, स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव ए.राजीव, मदत व पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विकास देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जाधव, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे आदी उपस्थित होते.
       पुणे मेट्रोसाठी विशेष कंपनीची स्थापना करुन जमीन संपादन, हस्तांतरणीय विकास हक्क या बाबींची लवकरात लवकर पूर्तता करावी. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेऊन पायाभूत सुविधा निर्मितीचा मोठा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. मुंबईमध्ये विशेषत: वाहतुकीशी संबंधित पायाभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. याच धर्तीवर पुणे व नागपूर येथे मेट्रो रेल्वे सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापुर्वीच घेतला आहे. केंद्र सरकारनेही या प्रकल्पांना तत्वत: मान्यता दिली आहे. आता सविस्तर प्रकल्प अहवाल, गुंतवणुक, जमीन संपादन आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी एका विशेष कंपनीची स्थापना करुन तिच्यामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
     महापालिकांची आर्थिक स्वायत्तता कायम ठेवण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार, व्यवसाय कर, करमणूक कर, रस्ता अनुदान, बिगरशेती सारा अनुदान यापोटी राज्य शासनाकडे जमा झालेल्या निधीची रक्कम पुणे महानगरपालिकेस विनाविलंब देण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले. यामुळे महानगरपालिकेला या महसुलातून विकास कामे विहित कालावधीत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
          पुण्याच्या मुंढवा भागातील केशवनगर येथील मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प सार्वजनिक प्रयोजनाकरिता राबविण्यात येणार असल्याने नदीकाठापासून 300 मीटरच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. पुण्याच्या उरळी देवाची व फुरसंगी येथील जमीन कचरा डेपो प्रकल्पासाठी संपादित केल्याने बाधित झालेल्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना महापालिका सेवेत घेण्यासंदर्भात या बैठकीत विचार करण्यात आला.  2009 च्या प्रकल्पग्रस्त धोरणानुसार या व्यक्तींची नियुक्ती करताना स्थानिक व्यक्तींना प्राधान्य या बाबीचा प्रामुख्याने विचार व्हावा, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
      पुणे महानगरपालिका हद्दीतील 34 गावे, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत 91 पदांची निर्मिती, पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे व पोलीस दलाची निर्मिती, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. च्या मिळकती बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करताना देण्यात येणारा अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक, पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीस मान्यता या संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
      पिंपरी चिंचवड येथे जिल्हा न्यायालय बांधण्याची कार्यवाही तात्काळ करावी, अनधिकृत बांधकामे हटवून मोकळ्या केलेल्या शासकीय जागेचा शासकीय कामासाठी त्वरेने वापर करावा असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एल.आय.जी कॉलनीतील वाढीव बांधकाम नियमित करण्याबाबत लोकांच्या मागणीच्या अनुषंगाने आवश्यक प्रस्ताव तयार करावा, पुण्यातील अनधिकृत बांधकाम मालमत्ता कर वसूल करण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, संरक्षण विभागाने नव्याने जाहीर केलेला रेड झोन कमी करणे, तसेच रेड झोनची हद्द निश्चित करणे, नदी ‍किनारी स्मशानभूमी ठेवण्यासाठी तेथे आधुनिक असे तंत्रज्ञान जसे विद्युत शवदाहिनी, शव दहनासाठी गॅसचा वापर करणे अशा अटींच्या अधिन राहूनच तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या बाबी विचारात घेऊनच परवानगी देण्यात यावीपिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील हरित पट्ट्यात येत असलेल्या जमिनी निवासी करण्याबाबत केंद्रिय पर्यावरण विभागाशी पत्रव्यवहार करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
       पुणे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील हद्दीत आदिवासी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजीत पवार म्हणाले, भोसरी, सांगवी आणि वाकड या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे स्थापित करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्या जमिन मालकांच्या जमिनी सार्वजनिक रस्त्यांसाठी संपादित करुन रस्ता तयार करण्यात आला आहे, परंतु त्यांना हस्तांतरणीय विकासहक्काच्या पोटी नुकसान भरपाई दिलेली नाही किंवा त्यांनी विकासहक्क घेतलेला नाही, अशा जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला देण्याबाबत कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असे आदेशही श्री. पवार यांनी यावेळी दिले.
******



विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. डोंगरे यांच्या निधनाने
एका संघर्षशील कार्यकर्त्याला राज्य मुकले  : मुख्यमंत्री
मुंबई, दि.18 :विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. सुर्यकांत जागोबाजी डोंगरे यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीतील एक संघर्षशील कार्यकर्त्याला राज्य मुकले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे. श्री. डोंगरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
उच्च विद्याविभूषीत श्री. डोंगरे यांनी सुरवातीला विद्यार्थी चळवळीला वाहिलेल्या संघर्ष या पाक्षिकाचे तसेच आचार्य अत्रे यांच्या मराठा या पत्रकाचे संपादनही त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांचा रिपब्लिकन चळवळीशी जवळचा संबंध आला. विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून ते समाजाच्या विकासासाठी कार्यरत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी निभावली. सामाजिक चळवळीत कार्य करीत असताना त्यांनी लेखन, वकीली आणि सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा, यासाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.
00000
आदिवासी समाजातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री
मुंबई, दि.18 :माजी आमदार नेताजी राजगडकर यांच्या निधनाने आदिवासी समाजातील एक अग्रणी नेता आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
आकाशवाणीवरील सायंकाळच्या बातम्यांमुळे संपूर्ण विदर्भात लोकप्रिय झालेल्या नेताजी राजगडकर यांचा पिंड हा सामाजिक कार्यकर्त्याचा होता. दीन, दलित व आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले.विधानसभेतील त्यांची कारकिर्द संस्मरणीय राहिली. सभागृहातील अभ्यासपूर्ण भाषणामुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली होती.आदिवासी समाजाच्या संशोधनामुळेते संपूर्ण राज्यात परिचित होते. शिक्षणाशिवाय आदिवासी समाजाचा विकास होणार नाहीही जाणीव त्यांना होती, असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.

00000