गुरुवार, ३ जानेवारी, २०१३



राज्याच्या जीडीपीमध्ये उत्पादनक्षेत्राचा वाटा 28 टक्केपर्यंत वाढविणार
नव्या औद्योगिक धोरणात 5 लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या
 उद्दिष्टामुळे अधिक रोजगाराला प्रोत्साहन - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 3 : देशातील औद्योगिक गुंतवणुकीतील महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम राखतानाच मागासभागात गुंतवणुकीचा ओघ वाढविणे आणि जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करणे, या उद्देशाने राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यात आले आहे. 20 लाख इतका नवीन रोजगार निर्मिती, 5 लाख कोटींची गुंतवणूक आणि राज्यातील एकुण जीडीपीमध्ये उत्पादनक्षेत्राचा वाटा 28 टक्केपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट हे धोरणाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या आद्योगिक धोरण 2013ची माहिती श्री. चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज दिली. श्री. चव्हाण यांनी हे धोरण अत्यंत कष्टपूर्वक तयार करणारे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे अभिनंदन केले. यावेळी उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले की, उद्योजक, औद्योगिक संस्था आणि सर्व संबंधितांशी चर्चा करुन, त्यांच्या अडीअडचणी, अपेक्षा लक्षात घेऊन आखण्यात आलेले राज्याचे नवे औद्योगिक धोरण जागतिक आर्थिक मंदीच्या वातावरणातही महाराष्ट्रात मोठी औद्योगिक गुंतवणुक खेचून आणेल. विशाल उद्योगांप्रमाणे अति विशाल उद्योगांना प्रोत्साहन, एक खिडकी योजनेचे सक्षमीकरण, एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची तरतूद यामुळे हे धोरण महाराष्ट्राचे उद्योगातील क्रमांक एकचे स्थान आणखी मजबुत करेल, असे ते म्हणाले.
उत्कृष्ट पायाभूत सुविधा, विकसित जमीन, वीज, पाणी याबरोबर महामार्ग, विमानतळ, बंदरे या सुविधांमुळे महाराष्ट्रात उद्योगांच्या वाढीसाठी अतिशय पोषक वातावरण आहे. 2006च्या औद्योगिक धोरणातील विशाल प्रकल्प धोरणामुळे राज्यात 2 लाख 80 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक आली. यापैकी 75 टक्के उद्योग मागासभागात सुरू झाले. आजही देशी-विदेशी गुंतवणूकदारांची महाराष्ट्र हीच पहिली पसंती आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरीडॉर (डीएमआयसी) आणि नॅशनल इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरींग झोन (एनआयएमझेड) मुळे राज्यातील औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळणार आहे. बंदर विकासाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. या मोक्याच्या वेळी अत्यंत महत्वाकांक्षी असे औद्योगिक धोरण आम्ही सादर करीत आहोत. उद्योगांना अखंडीत वीज पुरवठा करण्याच्या धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योगांना चालना मिळाली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विशेष औद्योगिक क्षेत्रासाठी कडक अटी घालणार
केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या विशेष औद्योगिक क्षेत्रांमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या सेझ विकासकांना अधिक कडक अटी घालून त्यांना एकात्मिक औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याची परवानगी देण्याचा या धोरणात समावेश आहे. विशेष आर्थिक क्षेत्रांच्या (सेझ) जमिनींवर एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची तरतूद आणि या क्षेत्रापैकी निव्वळ औद्योगिक वापरावयाच्या जागेचे प्रमाण 50 टक्क्यांवरुन 60 टक्के केल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढच होईल, असे प्रतिपादन श्री. चव्हाण यांनी केले. उरलेली 40 टक्के जमीन ही या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या निवासासाठी गृहबांधणी व अनुषंगिक कारणासाठीच वापरली जाणार आहे. यामुळे हे धोरण उद्योगांचे नसुन गृहनिर्माणासाठी असल्याची समजूत पूर्णत: चुकीची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाच्या विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम 2005 अंतर्गत राज्यामध्ये अनेक विशेष आर्थिक क्षेत्रे अधिसूचित करण्यात आली. जागतिक बाजारपेठेतील प्रतिकूल परिस्थितीत तसेच केंद्र शासनाकडून सवलती कमी केल्यामुळे काही विशेष आर्थिक क्षेत्रे ना अधिसूचित किंवा रद्द करण्यात आली.  ही परिस्थिती विचारात घेऊन ना अधिसूचित किंवा रद्द करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्राला बाहेर पाडण्यासाठी आणि राज्याच्या सुनियोजित औद्योगिक विकासासाठी एकात्मिक औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यासाठी धोरण आखण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
        महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि सिडको यांच्या सहभागाने स्थापन केलेले विशेष आर्थिक क्षेत्रे ना अधिसूचित झाल्यास त्यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ किंवा सिडको यांच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार एकात्मिक औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विशेष नियोजन प्राधिकरण असेल, असे सांगून मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, एकात्मिक औद्योगिक क्षेत्राच्या 60 टक्के क्षेत्र निव्वळ औद्योगिक वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठीच्या क्षेत्रावर पायाभूत सुविधा पुरविल्यानंतर 40 टक्के क्षेत्र रहिवासी आणि इतर लोकोपयोगी उपक्रमासाठी वापरता येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन
विशाल प्रकल्पांमुळे मिळणारे फायदे लक्षात घेऊन त्यांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एकत्रित प्रोत्साहने देण्याचे ठरविण्यात आले आहे.  विशाल प्रकल्पांसाठी तालुक्याच्या वर्गवारीनुसार असलेल्या रोजगार निर्मितीच्या किमान मर्यादेपेक्षा दुप्पट रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना अतिरिक्त प्रोत्साहन कालावधी आणि अतिरिक्त औद्योगिक विकास अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 
लघु आणि मध्यम उद्योगांच्या गुंतवणूक मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक असणाऱ्या उद्योगांची संख्या एमएसएमईडी ॲक्ट 2006 नुसार मोठे उद्योग म्हणून करण्यात आली आहे.  राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ तालुक्यांकरिता इतर प्रोत्साहनासाठी 7 वर्षे इतका पात्रता कालावधी आहे.  तसेच दरवर्षी देण्यात येणारी प्रोत्साहने ही एकूण प्रोत्साहने आणि पात्रता यांच्या प्रमाणात असेल असे सांगून मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, ‘अ’ आणि ‘ब’ तालुके वगळता इतर भागातील पात्र घटकांना त्यांनी उत्पादन केलेल्या पात्र उत्पादनावर स्थानिक विक्रीवरील 60 ते 100 टक्के मुल्यवर्धीत कर वजा इनपूट टॅक्स क्रेडिट किंवा शून्य यापैकी जे जास्त असेल तेवढा मुल्यवर्धीत कर अधिक केंद्रीय विक्री कर इतक्या मर्यादेपर्यंत औद्योगिक विकास अनुदान दरवर्षी देण्यात येईल.
उद्योगांना विविध सवलती
अन्न प्रक्रीय उद्योगाच्या विकासासाठी अतिरिक्त 10 टक्के औद्योगिक विकास अनुदान आणि पात्रता कालावधी 1 वर्षाची वाढ करण्यात आली आहे. ऊर्जा लेखा परीक्षण आणि पाणी लेखा परीक्षणासाठी झालेल्या एकूण खर्चाच्या 75 टक्के आणि जास्तीत जास्त अनुक्रमे 2 लाख व 1 लाख इतका परतावा अनुज्ञेय राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वीज आणि पाणी बचत करण्याच्या संदर्भात उद्योग घटकाकडून खरेदी केलेल्या यंत्रसामुग्रीच्या किंमतीच्या 50 टक्के आणि जास्तीत जास्त प्रत्येकी 5 लाख रुपये  इतक्या मर्यादेपर्यंत परतावा अनुज्ञेय राहणार आहे. या प्रोत्साहना व्यतिरिक्त ‘अ’ आणि ‘ब’ वर्गीकृत क्षेत्रे वगळता इतर क्षेत्रातील पात्र मोठ्या उद्योगांना गुंतवणूक कालावधी जमीन संपादन करण्यासाठी व मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्कातून 100 टक्के सूट देण्याचे धोरणात ठरविण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याचबरोबर ‘अ’ आणि ‘ब’ वर्गीकृत क्षेत्रे वगळता इतर क्षेत्रातील पात्र उद्योग घटकांना पात्रता कालावधीकरिता विद्युत शुल्क देण्यापासून सूट देण्यात येणार आहे.  त्याचबरोबर ‘अ’ आणि ‘ब’ क्षेत्रातील पात्र 100 टक्के मोठे निर्यातक्षम उद्योग, पात्र मोठे माहिती तंत्रज्ञान उद्योग आणि जैवतंत्रज्ञान घटकांना विद्युत शुल्कातून 7 वर्षे सूट देणार येणार असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी शेवटी सांगितले.   
सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांना आर्थिक सवलती- उद्योगमंत्री राणे
राज्यात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यावेत आणि त्याद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी या उपक्रमांना आर्थिक सवलती आणि प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री श्री. नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
प्रामुख्याने समूह विकास-नवीन योजनेंतर्गत योजना, स्पर्धात्मक वाढीसाठी कार्यक्रम, बीज भांडवल योजनेमध्ये सुधारणा, सुक्ष्म व लघु व मध्यम उपक्रमांना प्रोत्साहने आदींचा समावेश आहे. सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत म्हणून राज्य शासन सामुहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत एकत्रित आर्थिक सवलती देण्यात येणार आहेत. यामध्ये ‘अ’ वर्ग तालुका/क्षेत्रात अनुज्ञेय भांडवली गुंतवणुकीच्या टक्केवारीची कोणतीही आर्थिक मर्यादा नसून सात वर्षे पात्रता कालावधी राहणार आहे. ‘ब’ वर्ग तालुका/क्षेत्रात अनुज्ञेय भांडवली गुंतवणुकीच्या टक्केवारीची आर्थिक मर्यादा 20 टक्के असून सात वर्षे पात्रता कालावधी राहणार आहे. ‘क’ वर्ग तालुका/क्षेत्रात अनुज्ञेय भांडवली गुंतवणुकीच्या टक्केवारीची आर्थिक मर्यादा 40 टक्के असून सात वर्षे पात्रता कालावधी राहणार आहे. ‘ड’ वर्ग तालुका/क्षेत्रात अनुज्ञेय भांडवली गुंतवणुकीच्या टक्केवारीची आर्थिक मर्यादा 70 टक्के असून 10 वर्षे पात्रता कालावधी राहणार आहे. ‘ड+’ वर्ग तालुका/क्षेत्रात अनुज्ञेय भांडवली गुंतवणुकीच्या टक्केवारीची आर्थिक मर्यादा 80 टक्के असून 10 वर्षे पात्रता कालावधी राहणार आहे. विना उद्योग जिल्हे असलेल्या तालुका/क्षेत्रात अनुज्ञेय भांडवली गुंतवणुकीच्या टक्केवारीची आर्थिक मर्यादा 90 टक्के असून 10 वर्षे पात्रता कालावधी राहणार आहे. नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या तालुका/क्षेत्रात अनुज्ञेय भांडवली गुंतवणुकीच्या टक्केवारीची आर्थिक मर्यादा 90 टक्के असून 10 वर्षे पात्रता कालावधी राहणार आहे. अशाप्रकारे सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रोत्साहनाची एकूण मर्यादा ठरविण्यात आल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ तालुके वगळता इतर भागातील पात्र घटकांना त्यांनी उत्पादन केलेल्या पात्र उत्पादनांवर (फिनीशी प्रोडक्ट) स्थानिक विक्रीवरील मूल्यवर्धीत कर वजा इनपुट टॅक्स किंवा शून्य यापैकी जे जास्त असेल तेवढा मूल्यवर्धीत कर अधिक केंद्रीय विक्रीकर अधिक इनपुट टॅक्स क्रेडीटच्या 20 टक्के ते 100 टक्के इतक्या मर्यादेपर्यंत औद्योगिक विकास अनुदान दरवर्षी दिले जाईल, असे सांगून उद्योगमंत्री राणे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पात्र घटकांना वीज दर एक रूपया प्रति युनिट व राज्याच्या इतर भागात ( अ वर्गीकृत तालुके वगळता) पन्नास पैसे प्रति युनिट या दराने उत्पादनाच्या दिनांकापासून तीन वर्षांसाठी अनुदान दिले जाईल. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गीकृत तालुके वगळता इतर भागातील पात्र घटकांना पात्रता कालावधींसाठी त्यांनी स्थ‍िर भांडवली मालमत्ता संपादन करण्याकरिता घेतलेल्या मुदत कर्जावर पाच टक्के व्याज अनुदान जास्तीत जास्त त्या वर्षासाठी वापरलेल्या व भरलेल्या वीज बील इतके दिले जाईल. अन्न प्रक्रिया उद्योगांवर भर देण्याच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त 10 टक्के औद्योगिक विकास अनुदान आणि पात्रता कालावधीत 1 वर्षाची वाढ करण्यात येईल.
ऊर्जा लेखा परीक्षण (ऑडीट) आणि पाणी लेखा परीक्षणासाठी (ऑडीट) झालेल्या एकूण खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त अनुक्रमे दोन लाख आणि 1 लाख इतका परतावा अनुज्ञेय राहील. तसेच वीज आणि पाणी बचत करण्याच्या संदर्भात उद्योग घटकांकडून खरेदी केलेल्या यंत्रसामुग्रीच्या किंमतीच्या 50 टक्के व जास्तीत जास्त प्रत्येकी पाच लाख रूपये इतक्या मर्यादेपर्यंत परतावा अनुदान देण्यात येणार आहे. यासोबतच एमएसएमईचा दर्जा वाढविणे आणि स्पर्धात्मकतेसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र, संशोधन व विकास कार्यक्रम, तंत्रज्ञान वृद्धी, प्रदुषणमुक्त-उत्पादन उपाययोजना व पेटंट रजिस्ट्रेशन आदीसाठी देय असलेले प्रोत्साहने सुधारीत करून पुढे चालू ठेवण्यात येतील, असे सांगून ते पुढे म्हणाले की, या प्रोत्साहनांव्यतिरिक्त ‘अ’ आणि ‘ब’ वर्गीकृत तालुका वगळता इतर क्षेत्रातील पात्र सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना गुंतवणूक कालावधीत जमिन संपादन करण्यासाठी (असाईनमेंट लीज व विक्री प्रमाणपत्रासह) व मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्कातून 100 टक्के सूट देण्यात येईल. मात्र ‘अ’ क्षेत्रातील फक्त माहिती तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान उद्यानातील पात्र घटकांना मुद्रांकशुल्क सूट देण्यात येईल. सा.प्रो.यो. 2007 अंतर्गत पात्र घटकांना त्यांच्या गुंतवणूक कालावधीत मुद्रांक शुल्क सूट देण्यात येईल. याव्यतिरिक्त वर्गीकृत तालुका वगळता इतर क्षेत्रातील पात्र नवीन सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना पात्रता कालावधीकरिता वीज शुल्क देण्यापासून सूट देण्यात येईल. मात्र ‘अ’ आणि ‘ब’ क्षेत्रातील 100 टक्के निर्यातक्षम सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम आणि पात्र माहिती तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान घटकांना वीज शुल्कातून सात वर्षासाठी सूट देण्यात येईल.
सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या अस्तित्वासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी वेळेवर व पुरेसे आणि माफक दराने आर्थिक सहाय्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. स्वतंत्रपणे केलेल्या पत निर्धारणामुळे वित्तीय संस्थांना सुक्ष्म, लघु व मध्य उपक्रमांची पतपात्रता ठरविण्यास मदत होईल. त्यासाठी शासनाकडून सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या पत निर्धारणामध्ये अधिक प्रोत्साहने देण्यासाठी स्वतंत्र योजना आखण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात तीन नवे इंडस्ट्रीअल कॉरीडॉर
राज्यात उद्योगाच्या वाढीसाठी औद्योगिक पायाभूत सुविधांच्या विकासासासाठी समिती, प्रशासकीय कार्यपद्धतीचे सुलभीकरण, कौशल्य विकास कार्यक्रम, आजारी उद्योगांचे पुनर्वसन, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरीडॉर आणि मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि मुंबई-पुणे-सोलापूर तसेच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे दुय्यम वाढीचे कॉरीडॉर तयार करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तसेच नवीन सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये अतिरिक्त 0.50 पर्यंत चटई निर्देशांकात वाढ केली जाणार आहे. असे सांगून उद्योग मंत्री राणे म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये सुक्ष्म, लघु उद्योगासाठी तसेच महिला, अनुसूचित जाती, जमातींच्या उद्योगाला आणि उत्पादन करणाऱ्या महिला बचतगटांना भूखंडांचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना सल्ला आणि मार्गदर्शनासाठी प्रधान सचिव उद्योग यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक कक्षाची स्थापना तसेच महा-ई-बीझ आणि आणि केंद्र शासनाच्या ई-बीझ प्रकल्पांतर्गत उद्योजकांना ऑनलाईन सेवा पुरविण्यात येणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.
00000




बुधवार, २ जानेवारी, २०१३


मंत्रिमंडळ निर्णय
2 जानेवारी 2013
(मंत्रिमंडळ बैठक क्र.102)
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत
प्रोत्साहन योजना राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत प्रोत्साहन योजना राबविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेंतर्गत नवीन पाच उपक्रम राबविण्यात येतील.
राज्य सांस्कृतिक धोरण 2010 च्या निर्णयानुसार शास्त्रीय संगीतास प्रोत्साहन देण्यासाठी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे नवीन योजना सुरु करण्यात येत आली आहे. याअंतर्गत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी गुरूकुल योजना, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान हे पाच उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेणारे सहा आणि शास्त्रीय वादनाचे सहा अशा एकूण 12 विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रूपयांप्रमाणे दोन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळेल. यामुळे शास्त्रीय संगीतामधील शिक्षण घेणाऱ्या हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती देऊन त्याच्या कलेच्या शिक्षणास मदत होईल. पदविका आणि पदवीचे शास्त्रीय संगीतात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीदिनी 24 जानेवारी रोजी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येणार आहे. दरवर्षी एका महसुली विभागात दोन दिवसांचा हा महोत्सव होणार असून यासाठी शास्त्रीय गायन क्षेत्रातील दोन आणि शास्त्रीय वादन क्षेत्रातील दोन अशा चार कलावंतांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी गुरूकुल योजना उपक्रमांतर्गत प्राचीन काळानुसार गुरूच्या घरी जाऊन तेथे राहून शिष्याने शास्त्रीय संगीताचे पदवीनंतरचे पुढील ज्ञान प्राप्त करावे अशी अपेक्षा आहे. यासाठी शासनाने एक गुरूकुल उभे करणे आवश्यक आहे. यासाठी नवीन जागा शोधणे किंवा अन्य पर्यायांचा विचार करण्यात येत आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार योजनेंतर्गत शास्त्रीय गायन आणि वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कलावंतास पाच लाख रूपयांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवामध्ये देण्यात येणार आहे. या जीवन गौरव पुरस्कारासाठी कलाकाराची निवड भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार निवड समिती करणार आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक महसुली विभागातील एक याप्रमाणे सहा शास्त्रीय संगीतातील संस्थांना प्रत्येकी दोन लाख रूपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान मिळविण्यासाठी संस्था पूर्णत: शास्त्रीय संगीतक्षेत्रात किमान दहा वर्षे कार्यरत असावी लागणार आहे. संस्था शास्त्रीय संगीताचे विविध कार्यक्रम वर्षभर सादर करीत असेल तसेच शास्त्रीय संगीताच्या जतन व संवर्धनाचे काम करीत असल्यास त्या संस्थेला प्राधान्य देण्यात येणार आहे. तीन वर्षांचे संस्थेचे लेखापरिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. संस्थेस एकदा अनुदान प्राप्त झाल्यानंतर पुढील चार वर्षे संबंधित संस्था अनुदानासाठी पात्र राहणार नाही. संस्थेला अनुदान प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे लागेल, अन्यथा पुढील शासकीय अनुदानासाठी संबंधित संस्था कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात येणार आहे. 
           आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 45 लाख 66 हजार रूपये खर्चाचे पाच नवीन उपक्रम सुरु करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
-----0-----
मदत  व पुनर्वसन
टंचाई परिस्थिती जाहीर झालेल्या गावातील पाणी योजनेच्या
वीज देयकांसाठी 67 टक्के अनुदान देण्याचा निर्णय

          खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50 टक्केपेक्षा कमी असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी पुरवठा योजनेची चालू म्हणजेच 1 एप्रिल 2012 नंतरची देयके भरण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून 50 टक्के, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या टंचाई निधीतून 17 टक्के असे एकूण 67 टक्के अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उर्वरित 33 टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायत किंवा पाणी पुरवठा संस्था यांनी उभा करावयाचा आहे.  
          1 एप्रिल 2012 पूर्वी थकबाकीची देयके अभय योजनेखाली 12 हप्त्यात भरण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आजच्या निर्णयानुसार लाभधारकांना प्रत्यक्ष 67 टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल.
जनावरांच्या छावण्यांवर 180 कोटी रुपये खर्च
राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात 107, उस्मानाबाद जिल्ह्यात 2, बीड जिल्ह्यात 7, पुणे जिल्ह्यात 1, सातारा जिल्ह्यात 90,  सांगली जिल्ह्यात 20 आणि सोलापूर जिल्ह्यात 109 गुरांच्या छावण्या उघडण्यात आल्या आहेत.  यामध्ये एकूण 2 लाख 99 हजार 239 जनावरे आहेत.  जनावरांच्या छावणीवर आतापर्यंत 180 कोटी 61 लाख एवढा खर्च करण्यात आला आहे. चारा छावणीतील जनावरांना 1 जानेवारी 2013 पासून मोठ्या जनावरांसाठी प्रती 60 रुपये आणि छोट्या जनावरांसाठी 30 रुपये अशी खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली. 
6 हजार 250 गावांमध्ये टंचाई परिस्थिती जाहीर
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या टंचाई परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हंगामी पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेल्या 6 हजार 250 गावांमध्ये टंचाई परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत टंचाई निर्माण झालेल्या गावात आवश्यकतेनुसार कामे सुरु करावीत आणि कोणतीही व्यक्ती रोजगारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.  रोजगार मागणाऱ्यांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन पुरेशी कामे शेल्फवर उपलब्ध असतील याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 
जलाशयातील पाणीसाठा
महाराष्ट्रात एकूण 2 हजार 468 प्रकल्प असून यात आज अखेर 61 टक्के एवढा पाणीसाठा आहे.  कोकण विभागात सर्वाधिक म्हणजन 80 टक्के पाणीसाठा तर मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजे 19 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.  नागपुरात 53 टक्के, अमरावती 56 टक्के, नाशिक 60 टक्के, पुणे 69 टक्के एवढा पाणीसाठा आहे.
जेथे पाण्याची टंचाई असेल तेथे ती दूर करण्यासाठी टँकर, बैलगाड्यांमार्फत पाणी पुरवठा करणे, तात्पुरत्या नळपाणी पुरवठ्याद्वारे कार्यान्वित करणे आदी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.  टंचाईग्रस्त भागातील मोठ्या, मध्यम आणि लघुप्रकल्पामध्ये साठणारे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेशही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद या  चार विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी 2012-13 या वर्षातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे.  त्यानुसार 7 हजार 64 गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आढळून आली आहे.  नागपूर आणि अमरावती या दोन विभागांची अंतिम पैसेवारी 15 जानेवारी 2013 रोजी जाहीर करण्यात येईल.
-----0-----
विधी व न्याय विभाग
नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता
नवीन 15 पदास मान्यता देण्याचा निर्णय
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्यासह नवीन 15 पदांची निर्मिती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यात सध्या एकूण 14 अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालये कार्यरत आहे. नेवासा हे ठिकाण श्रीरामपूर न्यायालयाच्या प्रशासकीय अधिपत्याखाली आहे. श्रीरामपूर न्यायालयात गेल्या तीन वर्षात अनुक्रमे एक हजार 278, एक हजार 379, एक हजार 359 खटले दाखल झाले आहेत. त्यापैकी तीन हजार 378 खटले प्रलंबित आहे. नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडे 899 दिवाणी आणि 568 फौजदारी प्रकरणे वर्ग केल्यास श्रीरामपूर न्यायालयावरील प्रलंबित खटल्यांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.
दुय्यम न्यायालयातील प्रकरणांचे वाढते प्रमाण पाहता नागरिकांना तात्काळ न्याय देण्याची व्यवस्था करण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे. सध्या अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात गेल्या तीन वर्षांत प्रलंबित खटल्यांचा वाढता अतिभार पाहता हे प्रकरणे, खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी नेवासा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने आवश्यक असलेल्या एकूण 15 पदांना मान्यता देण्यात आली आहे.
00000

मंगळवार, १ जानेवारी, २०१३


तंत्रज्ञानामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात
 थेट रक्कम जमा हा ऐतिहासिक क्षण
-         मुख्यमंत्री
मुंबई,दि. 1 : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे अनुदान, सबसिडी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात आधार क्रमांकाच्या आधारे जमा करण्यात येणाऱ्या योजनेचा शुभारंभ हा ऐतिहासिक क्षण असून या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला.
          केंद्र शासनाने योजनांच्या अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना 1 जानेवारी 2013 पासून सुरु केली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील पुणे, अमरावती, नंदुरबार, वर्धा, मुंबई शहर, मुंबई उपनगर अशा सहा जिल्ह्यांचा या योजनेंतर्गत समावेश आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासकीय अनुदानाचे वाटप त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज विधानभवन येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
          या कार्यक्रमास मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव जयन्त कुमार बाँठिया, कोकण विभागाचे आयुक्त विजय नाहटा, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय देशमुख, वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
          उपस्थितांना नववर्षांच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाला आधार क्रमांकाच्या सहाय्याने ओळख देण्याचा कार्यक्रम केंद्र शासनाने हाती घेतला. या क्रमांकामुळे माणसाची एक वेगळी ओळख निर्माण होते. अशाप्रकारे संगणकीकरणाचे हाती घेतलेले हे काम जगातील सर्वात मोठे काम असावे. क्षणार्धात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासकीय अनुदानाचे पैसे जमा होणे ही एक प्रकारे तंत्रज्ञानाची किमया आहे. राज्य शासन हे तंत्रज्ञान पूर्णपणे आत्मसात करुन प्रशासनाची कार्यक्षमता वाढवेल. शासकीय नव्हे तर इतर व्यवसायातसुध्दा अशाप्रकारच्या तंत्रज्ञानांचा वापर करता येऊ शकेल असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत करीअरसाठी शुभेच्छा दिल्या.
          श्री. पाटील म्हणाले की, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांला पैसे मिळण्याची हमी मिळेल तसेच पारदर्शकपणे सरकारी अनुदानाचे वाटप होईल. प्रशासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत सर्व जिल्हे या योजनेंतर्गत घ्यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.                                                                                                 
          मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना एटीएमकार्डसह आवश्यक ती सामग्री देण्यात आली. तसेच मायक्रो एटीएमच्या सहाय्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात आले. मुंबई शहर जिल्ह्यातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच ईएसआयएस या योजनेंतर्गत तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल कामगार विभागाकडे दोन योजनांचा व ईएसआयएस या योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम क्षणार्धात जमा करण्यात आली.
          युआयडीचे उपमहासंचालक डॉ.अजय भूषण पांडेय यांनी या योजनेंतर्गत तीन लाख लाभार्थ्यांना मार्च 2013 पर्यंत समाविष्ट करुन घेण्याचे नियोजन आहे, असे सांगितले.
माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन या योजनेची माहिती दिली. मुंबईचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आधारचे राज्य समन्वय अधिकारी डॉ. संतोष भोगले, देवरूप धर आदींचा सहभाग होता.
0 0 0 0