रविवार, ३१ मार्च, २०१३

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन
देण्यासाठी विशेष प्रयत्न - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 31:  मोठ्या  शहराची मक्तेदारी संपवून सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर खेळाडू पुढे येत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या क्रीडा धोरणातंर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत  आहेत. विशेषत: अपंग खेळाडूंसाठी  खास सोयी-सुविधा दिल्या जात असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  आज येथे केले.
            ऑल इंडिया  क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजीकली चॅलेंज्ड  या संघटनेच्या वतीने आयोजित अपंगांसाठीच्या राष्ट्रीय रौप्य महोत्सवी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईतील पोलीस जिमखान्याच्या मैदानावर झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अजित वाडेकर, एल.आय.सी.चे अध्यक्ष डी.के. मेहरोत्रा, एस.बी.आय.चे मुख्य महाव्यवस्थापक जे.एन. मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
            
मुख्यमंत्री म्हणाले, खेळताना जात, धर्म, रंग, भेद या भावना बाजूला ठेवून खेळाडू केवळ भारतीय म्हणूनच खेळत असतो. ही खिलाडू वृत्ती त्यांना आयुष्यभर उपयोगी ठरते. अपंग खेळाडू शारिरीक अडचणींवर मात करुन कौशल्य दाखवीत आहेत. याच खिलाडूवृत्तीतून बळ मिळवून ते आयुष्यातील अडचणीवरही सहजतेने मात करु शकतील. भारतीय क्रिकेट बोर्ड सर्वात श्रीमंत समजले जाते. त्यांनी क्रिकेटमधील सर्व प्रकाराच्या उन्नतीसाठी मदत करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
            राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई असून त्यावर मात करण्यासाठी शासनामार्फत सर्व ते प्रयत्न केले जात   आहेत. या कामी सर्वांनी आपआपल्या परीने हातभार लावावा, असे  आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
            मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यक्षीय संघ आणि पश्चिम विभाग यांच्यातील सामन्याचे नाणेफेक करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अजित वाडेकर यांनी प्रास्ताविकाद्वारे संघटनेच्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. तर संघटनेचे सचिव टी.पी. मिरजकर यांनी खेळाडूंना  खेळभावनेची शपथ दिली.
            यावेळी स्पर्धेचे प्रायोजक, मुंबई क्रिकेट असोशिएशन आणि ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजीकली चॅलेंज्ड चे पदाधिकारी,  खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000



मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते रविंद्र नाट्य मंदीर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हजारो नेत्ररुग्णांसाठी दृष्टीदाता ठरलेले नेत्र चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा `प्रहार भूषण  जीवनगौरव`ने सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ.निलेश राणे, स्वाभिमानचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे आदी मान्यवर 




महाराष्ट्रातील नररत्ने शोधण्याच्या उपक्रमाची `प्रहार`ची  संकल्पना कौतुकास्पद - मुख्यमंत्री
            मुंबई,दि. 31:  महाराष्ट्र ही रत्नांची खाण आहे.  ही नररत्ने शोधुन त्यांचा सन्मान करण्याच्या  उपक्रमाची `प्रहार`  ची संकल्पना खरोखरच कौतुकास्पद आहे,  असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे काढले.
            रविंद्र नाट्य मंदीर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हजारो नेत्ररुग्णांसाठी दृष्टीदाता ठरलेले नेत्र चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते `प्रहार भूषण  जीवनगौरव`ने सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ.निलेश राणे, स्वाभिमानचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले,  खडतर परिस्थितीतून विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेल्या व्यक्तींचा शोध घेणे  कठीण असून हे काम प्रहारने हाती घेतले आहे. ते सतत पुढे चालू राहील आणि या वर्षीचा सत्कारमूर्ती कोण ?  याची  जनता प्रत्येक वर्षी आतुरतेने वाट पाहील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी  यावेळी व्यक्त केली.
            उद्योगमंत्री श्री.राणे यावेळी म्हणाजे की, प्रहार हे वृत्तपत्र, व्यवसाय म्हणून नव्हे तर पत्रकारितेतील धर्म  म्हणून प्रामाणिक आणि निर्भिडपणे काम करीत आहे. चांगल्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच सामाजिक जाणीव व बांधीलकीचा  वसा प्रहारने घेतला आहे.
            श्री.भुजबळ यावेळी म्हणाले की, प्रहार  सकारात्मक दृष्टी ठेवून आपली  वाटचाल करीत आहे,  ही बाब समाधानकारक आहे. प्रहार भूषण सन्मानासाठी निवडलेल्या  व्यक्ती खऱ्या अर्थाने समाजभूषण आहेत, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.
            या सन्मान सोहळ्यात वाडा तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी अनिल पाटील, पर्यटन क्षेत्रात  स्वत:चे अढळपद निर्माण करणारे  उल्हास खातू, धडाडीचे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे  पाटील,  सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत, आजच्या पिढीतील आघाडीचे दिग्दर्शक   रवी जाधव, अभिनेता जितेंद्र  जोशी, शिक्षण क्षेत्रातील सुधीर दिक्षीत, गजालीचे मालक चंद्रकांत शेट्टी आणि दिल्लीवर मराठीचा झेंडा रोवणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट  पुरस्कार विजेत्या मराठी कलाकारांचा यावेळी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ  देवून सत्कार करण्यात आला.
000

शनिवार, ३० मार्च, २०१३

गोसीखुर्द प्रकल्पाला केंद्राकडून 405 कोटी रुपयांचा निधी
 नवी दिल्ली,  दि. 30 मार्च :- विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यात महत्त्वपूर्ण ठरणा-या गोसीखुर्द प्रकल्पाला केंद्राकडून 405 कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आला आहे.  वेगवर्धीत सिंचन लाभ प्रकल्पाअंतर्गत राज्य शासनाकडे या प्रकल्पासाठी हा निधी वळता करण्यात आला आहे.
            गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाला असून पूर्णत्वाकडे आलेल्या या प्रकल्पाला सन 2012-2013 या आर्थिक वर्षासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.  राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून आवश्यक निधी मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु ठेवला आहे.  या आर्थिक वर्षाच्या अखेरीस राज्यातील गोसीखुर्द या प्रकल्पासोबतच अरुणा पाटबंधारे प्रकल्पाला 14.18 कोटी, वाघुर पाटबंधारे प्रकल्पासाठी 76.23 कोटी मंजूर करण्यात आले आहे. 
            केंद्र शासनाच्या वित्त विभागाने 28 मार्च 2013 रोजी या निधीला मंजूरी दिली आहे

0000




गुरुवार, २८ मार्च, २०१३


प्रशासकीय यंत्रणा अधिक गतीमान होणे आवश्यक - मुख्यमंत्री
          मुंबई, दि. 28 : राज्याच्या विकासात प्रशासनाचे महत्वाचे स्थान आहे. राज्याचा विकास दर वाढावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक गतीमान करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले.
          राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा सन 2011 व 12 या वर्षाचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मंत्रालयातील परिषद सभागृहात करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, आमदार श्रीमती ॲनी शेखर, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया उपस्थित होते.
          मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी प्रशासनातील रिक्त असलेली सर्व पदे भरण्यात येतील. राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणे प्रशिक्षण देणे आवश्यक असून त्यांना किमान एक वर्षाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन करावे. आज राज्यात नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून जवळपास 50 टक्के लोक शहरात रहात आहेत. पुढे हे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी नागरी प्रशासन बळकट असणे गरजेचे आहे. प्रशासकीय सेवेत चांगले काम व्हावे यासाठी स्पर्धा होणे आवश्यक आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा राज्यात 1 ते 7 मे या कालावधीत नागरी सेवा सप्ताह साजरा करुन गौरव करावा. राज्याचा मानवी विकास अहवाल नियमित प्रकाशित करावा, असेही त्यांनी सांगितले.
          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ई-ऑफिस प्रणालीमुळे प्रशासनात पारदर्शकता येते. तसेच महसुलातही वाढ होते यासाठी ई-ऑफिसचा जास्तीत जास्त वापर व्हायला पाहिजे. प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत काम करताना लोकांचे हित कसे होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी संगणकीकरणाचा घेतलेला निर्णय दूरदृष्टी आणि प्रशासनात पारदर्शकता आणणारा होता. जिल्हाधिकाऱ्यांना नवीन कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 4.5 टक्के निधी देण्यात येणार आहे. शासनाच्या चांगल्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी केल्याशिवाय त्याचा चांगला परिणाम दिसत नाही म्हणून प्रशासनाने निर्णयाची अंमलबजावणी तत्परतेने करावी, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
          जयंत पाटील म्हणाले की, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. राज्यातील ग्राम पातळीवर बायोमॅट्रिक पध्दत सुरु केल्यामुळे भविष्यात चांगला परिणाम दिसून येईल. प्रशासन गतीमान होण्‍यासाठी आवश्यक तेथे प्रशासनातील एखादा टप्पा कमी करण्यात यावा. सामान्य प्रशासन विभागात ई-गव्हर्नन्स करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या कार्य पध्दती नव्याने विकसित करायला हव्यात, यासाठी आवश्यक तेथे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
          राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या की, सध्याचे जग गतिमान आहे. गती हा विकासाचा मंत्र आहे. गतिमान प्रशासन कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे आवश्यक आहे. गाव पातळीवर सुध्दा अनेक चांगले उपक्रम होत असतात. त्याची नोंद होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण कामाची माहिती ग्रामपातळीपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी प्रयत्न करावे.
          सन 2011 चे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा प्रथम पारितोषिक विभागून तत्कालिन विक्रीकर आयुक्त संजय भाटिया व  तुळजाभवानी संस्था तुळजापूरचे अध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्हाधिकारी प्रविण गेडाम यांना देण्यात आले. दुसरे पारितोषिक व्ही.के. गाडेकर, प्राचार्य, मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बार्शी रोड, लातूर  तर तृत्तीय पारितोषिक अनिल वळीव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांना देण्यात आले.
          सन 2012 चे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा प्रथम पारितोषिक विकास खारगे, आयुक्त कुटुंब कल्याण व संचालक राष्ट्रीय ग्रामीण अभियान द्वितीय पारितोषिक विरेंद्र सिंह, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तर तृत्तीय पारितोषिक शीलानाथ जाधव, संचालक लेखा व कोषागरे, मुंबई यांना देण्यात आले. याबरोबरच संबंधीत कार्यालयाच्या प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला.
          प्रथम पुरस्कार 10 लाख रुपये, द्वितीय पुरस्कार 6 लाख रुपये व तृत्तीय पुरस्कार 4 लाख रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
          याप्रसंगी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव पी.एस. मीना यांनी केले. तर वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी.बक्षी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
          कार्यक्रमास वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000


छत्रपती शिवाजी महाराजांच्या
स्मारकासाठी संभाव्य जागेची पाहणी
         अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून आज अरबी समुद्रातील संभाव्य जागेची पाहणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
          आज मुख्यमंत्री श्री. चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहराचे पालकमंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष जयंत पाटील, आमदार विनायक मेटे, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांनी स्मारकासाठी  अरबी समुद्रातील संभाव्य जागेची पाहणी केली. त्यानंतर बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी स्मारकाशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबई शहराचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी निश्चित केलेल्या काही संभाव्य जागांची आज पाहणी केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या स्मारकासाठी विविध प्रकारच्या 25 मान्यता आवश्यक आहेत. त्या मिळविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्येच केंद्रीय पर्यावरणमंत्री मुंबईत येत आहेत. या भेटीदरम्यान त्यांच्यासमोर स्मारकासंबंधीचे सादरीकरण करण्यात येऊन चर्चा केली जाईल.  पर्यावरण मंत्रालयाच्या मान्यतेबरोबरच इतर आवश्यक मान्यताही लवकरात लवकर घेऊन स्मारकाच्या कामाला गती देण्यात येईल.
0 0 0 0




मंगळवार, २६ मार्च, २०१३

महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज प्रत्येकी एक कोटी रूपयांचे तर प्रशिक्षकांना 25 लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, आमदार भाई जगताप, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव जे. एस. सहारिया, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा सहसंचालक एन.एम.सोपल आदी.





मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) साठी
देणगीदारांना आता थेट बँकेत धनादेश जमा करता येतील
मुंबई, दि.26 मार्च : मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीस मदत करु इच्छिणाऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून देणगीदारांना थेट बँकेमध्ये किंवा संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेश जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीसाठी मदत करावयची आहे त्यांनी संबंधीत विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात उपायुक्त महसूल किंवा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीचे धनादेश अथवा बँक ड्राफ्ट द्यावेत. हे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ 2013)/Chief Minister Relief Fund (Drought 2013) स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट शाखा खाते क्र. S.B.32860305777 या नावे द्यावे. हा धनादेश स्विकारल्यानंतर देणगीदारास मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावाने कच्ची पावती मिळेल. अशारितीने सर्व धनादेश किंवा ड्राफ्टची यादी करुन विशेष दूतामार्फत प्रत्येक आठवडयाच्या सुरुवातीला लेखाधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतील.
बँकेत थेट भरणा
देणगीदार थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत स्वत: आपला धनादेश किंवा ड्राफ्ट जमा करु शकतात. हे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ 2013)/Chief Minister Relief Fund (Drought 2013) स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट शाखा खाते क्र. S.B.32860305777 या खात्यात जमा करावेत. ही रक्कम जमा केल्यानंतर देणगीदारांनी पत्राद्वारे लेखाधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई-32 यांना बँकेच्या पावतीच्या प्रतिसह कळवावे, ज्यायोगे त्यांना पावती पाठविणे सोपे जाईल.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी लेखाधिकारी, मुख्यमंत्री निधी कक्ष यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 022-22793759 किंवा 022-22026948 अथवा श्रीमती पाटणकर, लेखाधिकारी यांच्याशी 9833428046 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे.
ही सर्व माहिती विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील सूचना फलकावर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
0000000


राज्यातील जल,  अपारंपरिक ऊर्जा व कृषी क्षेत्रामध्ये
संशोधनास सर्वतोपरी सहाय्य : मा. मुख्यमंत्री
मुंबई, दि. 25 : मॅसेच्युसेटस् इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि टाटा कंपनीमधील करारानुसार जल, अपारंपरिक ऊर्जा व कृषी या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या संशोधनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून सर्व ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण यांनी आज दिले.
केंब्रिज येथील मॅसेच्युसेटस् इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष एल. राफेल रेफ आणि उद्योगपती श्री. रतन टाटा यांनी मा. मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अविकसित देश वगळता जल, अपारंपरिक ऊर्जा व कृषी या क्षेत्रांमध्ये फार मोठया समस्या नाहीत. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये या तीनही क्षेत्रांच्या विकासामध्ये काही समस्या भेडसावत असून त्यावर मात करणे आवश्यक असल्याबाबत चर्चेमध्ये एकमत झाले.  या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यास मोठा वाव आहे. अशा संशोधनातून या तीनही क्षेत्रांचा विकास आणि प्रगती होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात टाटा कंपनी आणि मॅसेच्युसेटस् इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये यापूर्वीच करार झाला आहे. या करारातंर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानद्वारे नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा स्थापन करुन या क्षेत्रांमध्ये संशोधन केले जाणार आहे. 
सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या चर्चेअंती, परस्पर सहकार्याने कार्यान्वित होणाऱ्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये पायाभूत सोयीसुविधा निर्माण होण्यास मोठे योगदान मिळेल अशी अपेक्षा श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली व त्यातून राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचाविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
*******

रविवार, २४ मार्च, २०१३

 साखर उद्योगाला सक्षम करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज - मुख्यमंत्री
कोल्हापूर दि. 24 : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणींवर मात केल्याशिवाय शेतकरी, सभासद, कामगार आणि साखर उद्योगाचे हित जोपासले जाणार नाही. त्यामुळे साखर उद्योग सक्षम करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
          नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने दिला जाणारा 'समाज वैभव' पुरस्कार आमदार सा. रे. पाटील यांना शिरोळ येथे मुख्यमंत्री  श्री. चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, सहकार चळवळीत महाराष्ट्राने देशासमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे ही चळवळ अधिक बळकट करुन ग्रामीण भागाचे जीवनमान उंचावणे आपली जबाबदारी आहे. राज्यात भीषण दुष्काळ असून दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. परंतु निसर्गाची अवकृपा पाहता यापुढे पाण्याच्या वापराचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी ऊस उत्पादकांनी 100 टक्के ठिबक सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच तीन वर्षात संपूर्ण ऊस शेती ठिबक सिंचनाखाली आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
          मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, नव्या औद्योगिक धोरणाचा वापर करुन विकास साधा. जागतिक मंदीची लाट आपल्याही देशात असून त्याचा परिणाम आपल्या राज्यावर होत आहे. सहकारी साखर कारखान्यांना इन्कमटॅक्स  मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण, क्षेत्रात बहुमोल योगदान आमदार सा. रे. पाटील यांनी दिले असल्याचे सांगून सच्चा सामाजिक कार्यकर्ता अशा शब्दात आमदार सा.रे. पाटील यांचा मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी गौरव केला.
          पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, कामगारांचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. शेतकरी, कामगार, साखर उद्योगाला बळकट करणे काळाची गरज आहे. शेतकरी, कामगार आणि उपेक्षितांची अवितरत सेवा करणारे नेते म्हणून आमदार सा. रे. पाटील यांची ओळख आहे. त्यांचा हा सन्मान सर्वांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले.
          महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, सहकार चळवळ रुजविण्यास आमदार सा. रे. पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. कामगारांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. महात्मा गांधी आणि मार्क्स यांच्या विचारांचा मिलाफ म्हणजे आमदार पाटील अशा शब्दांत महसूल मंत्री श्री. थोरात यांनी आमदार पाटील यांचा गौरव केला.

          ग्रामविकास मंत्री जयंत पाटील म्हणाले, दत्त सहकारी साखर कारखान्याने नेहमीच आदर्श काम केले आहे. राज्यात उत्तम दर्जाचा साखर उद्योग शिरोळ परिसरात आहे. शेतकरी मालक झाला पाहिजे म्हणून सहकाराची चळवळ सुरु झाली. त्याच विचाराने आमदार सा. रे. पाटील यांनी ही चळवळ रुजविली. त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान अनन्य साधारण आहे.
          यावेळी आमदार सा. रे. पाटील, ऍ़ड. के.डी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केले. तर प्रास्ताविक पुरस्कार समितीचे चेअरमन बी. आर. पाटील यांनी केले.
          यावेळी नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने देण्यात येणारा समर्पित कार्यकर्ता पुरस्कार सांगलीचे ऍ़ड. के.डी. शिंदे आणि पुण्याचे कैलास कदम यांना प्रदान करण्यात आला.  तसेच स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्त शेतकारी सहकारी साखर कारखाना, संलग्न संस्था आणि कर्मचारी यांच्यावतीने दुष्काळी भागासाठी एक कोटी 55 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांकडे आमदार सा. रे. पाटील यांनी सुपूर्द केली.
          यावेळी कर्नाटकचे आमदार काका पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार पी. एन. पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, दैनिक तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर, प्रतिष्ठाने पदाधिकारी, दत्त कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
0000000