गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३


बाभळी बंधारा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्राच्या बाजुने
दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देणारा निर्णय : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 28 : राज्यात विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करीत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने बाभळी बंधाऱ्याचे 11 मीटर उंचीचे दरवाजे उभारण्याच्या दिलेल्या परवानगीमुळे महाराष्ट्राचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरले आहे, याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या निर्णयामुळे 58 गावे आणि 8 हजार हेक्टर शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून ऐन दुष्काळात या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बाभळी प्रकल्प हा बंधारा आहे असा दावा महाराष्ट्राने वारंवार केला होता.  या बंधाऱ्यात  अडविण्यात येणारे पोचमपाड धरणाचे 0.6 टीएमसी पाणी प्रत्येक वर्षी 1 मार्चनंतर सोडण्याची राज्याची तयारी होती.  ही बाब सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून आता या संपूर्ण कार्यवाहीवर एक त्रिसदस्यीय समिती नेमून नियंत्रण ठेवावे असा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे योग्य न्याय मिळाला आहे. 
याचा सर्वाधिक फायदा जायकवाडी प्रकल्पातील गावांना होणार असून गेल्या 7 ते 8 वर्षातील न्यायालयीन लढाईला अखेर यश आले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओरिसा आणि मध्यप्रदेश या 5 राज्यांसाठी 1975 मध्ये गोदावरी खोऱ्यातील पाणी वाटपासाठी बच्छावत आयोगाची स्थापना करण्यात आली होती.  या लवादाने गोदावरी खोऱ्यातील पोचमपाड धरणाच्या वरच्या बाजुला 60 टीएमसी पाणी महाराष्ट्राला अडविण्याची मुभा दिली.  हे पाणी गोदावरी खोऱ्यात अडविण्यासाठी गोदावरी नदीवर 11 बंधारे बांधण्याचा निर्णय या लवादाच्या अधिन राहून घेण्यात आला होता.  त्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी हा शेवटचा बंधारा. सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हा बंधारा पूर्ण होऊन जलफुगवटा 65 कि.मी.पर्यंत येईल व त्याचा फायदा 58 गावांना होईल.
00000

सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा
पुढे नेणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री

मुंबई, दि. 28 : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा पुढे नेणारा त्याचप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर वाढविण्यासाठी प्रयत्न करणारा  हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
आपला आठवा अर्थसंकल्प सादर करताना श्री. पी. चिदंबरम् यांनी आर्थिक विकासाचा सामाजिक विकासाशी समतोल कायम राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री म्हणतात की, या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासासाठीची तरतूद तब्बल 46 टक्क्यांनी वाढविण्यात आली असून कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. युवा पिढी ही देशाचा आधारस्तंभ आहे.  शिक्षणासाठी 17 टक्के जादा तरतूद करण्यात आली आहे.  तसेच कौशल्यविकासासाठी एक हजार कोटी रूपये तरतूद करून युवकांची रोजगाराभिमुखता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे.
महिलांच्या सुरक्षे बरोबरच त्यांच्या सक्षमीकरणाचा विचार करताना अर्थमंत्र्यांनी पुरेशी संवेदनशिलता दाखविली आहे. मुलींच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपयांचा 'निर्भया निधी' स्थापन करून व महिलांसाठी विशेष बँक सुरू करून अर्थमंत्र्यांनी एक चांगला पायंडा पाडला आहे. युवक, गरीब आणि सर्वसामान्यांच्यासाठी दिलासा देणारे निर्णय अर्थमंत्र्यांनी घेतले आहेत. वाढती लोकसंख्या व चलनवाढ विचारात घेऊन महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा त्यांचा निर्णय क्रांतीकारी म्हणावा लागेल. उपेक्षीत वर्गासाठी समूहगट विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेताना अर्थमंत्र्यांनी गरीबातील गरीब माणसाचा देखील विचार केला आहे.
अर्थमंत्र्यांनी दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉर मधील औरंगाबाद जवळील शेंद्रा याठिकाणी स्मार्ट औद्योगिक शहराची मंजूरी,  त्याचप्रमाणे बंगलुरू-मुंबई या नवीन औद्योगिक कॉरीडॉरची घोषणा केली आहे.  महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्राच्या नवीन औद्योगीक धोरणाशी सुसंगत शहरांमध्ये कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती करणारे प्रकल्प हाती घेतल्यामुळे पर्यावरणपूरक विकास होईल. पायाभूत सुविधांसाठी 50 हजार कोटी रूपयांचे कर्जरोखे काढण्याच्या‍ निर्णयामुळे पायाभूत सुविधांना चालना मिळेल.
टेक्स्टाईल अपग्रेडेशन फंड तसेच विणकामगारांना सहा टक्के व्याजदराने सवलतीच्या कर्जपुरवठयामुळे वस्त्रोद्योग उद्योगाला संजिवनी मिळणार आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून चालू वर्षी महाराष्ट्रात रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात हाती घेण्यात येणार असल्यामुळे रस्ते विकासाला वेग येणार आहे. तसेच नैसर्गिक वायूच्या किंमती संदर्भातील धोरणामधील अडचणी दूर झाल्यास त्याचा फायदा दाभोळ प्रकल्पाला मिळू शकणार आहे.
सर्व सामान्यावर कुठलेही नवीन कर न बसविल्यामुळे आम आदमीला दिलासा दिला आहे.  महसूल तूट व आयात-निर्यातीतील तूट कमी करण्याच्या प्रयत्न सराहनशील आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


00000

बाभळी बंधारा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्राच्या बाजुने
दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देणारा निर्णय : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 28 : राज्यात विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करीत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने बाभळी बंधाऱ्याचे 11 मीटर उंचीचे दरवाजे उभारण्याच्या दिलेल्या परवानगीमुळे महाराष्ट्राचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरले आहे, याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या निर्णयामुळे 58 गावे आणि 8 हजार हेक्टर शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून ऐन दुष्काळात या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बाभळी प्रकल्प हा बंधारा आहे असा दावा महाराष्ट्राने वारंवार केला होता.  या बंधाऱ्यात  अडविण्यात येणारे पोचमपाड धरणाचे 0.6 टीएमसी पाणी प्रत्येक वर्षी 1 मार्चनंतर सोडण्याची राज्याची तयारी होती.  ही बाब सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून आता या संपूर्ण कार्यवाहीवर एक त्रिसदस्यीय समिती नेमून नियंत्रण ठेवावे असा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे योग्य न्याय मिळाला आहे. 
याचा सर्वाधिक फायदा जायकवाडी प्रकल्पातील गावांना होणार असून गेल्या 7 ते 8 वर्षातील न्यायालयीन लढाईला अखेर यश आले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओरिसा आणि मध्यप्रदेश या 5 राज्यांसाठी 1975 मध्ये गोदावरी खोऱ्यातील पाणी वाटपासाठी बच्छावत आयोगाची स्थापना करण्यात आली होती.  या लवादाने गोदावरी खोऱ्यातील पोचमपाड धरणाच्या वरच्या बाजुला 60 टीएमसी पाणी महाराष्ट्राला अडविण्याची मुभा दिली.  हे पाणी गोदावरी खोऱ्यात अडविण्यासाठी गोदावरी नदीवर 11 बंधारे बांधण्याचा निर्णय या लवादाच्या अधिन राहून घेण्यात आला होता.  त्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी हा शेवटचा बंधारा. सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हा बंधारा पूर्ण होऊन जलफुगवटा 65 कि.मी.पर्यंत येईल व त्याचा फायदा 58 गावांना होईल.
00000

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३


                                                        
टेंभू आणि उरमोडी प्रकल्पासाठी 120 कोटी रुपयांचा निधी वितरीत
दुष्काळी भागातील कामांना प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई दि. 27 फेब्रुवारी :  महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या टेंभू आणि उरमोडी या दोन प्रकल्पासाठी  119 कोटी 80 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. यापैकी टेंभू प्रकल्पासाठी 73 कोटी 7 लाख तर उरमोडी प्रकल्पासाठी 46 कोटी 72 लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला.
टेंभू आणि उरमोडी या दोन प्रकल्पामुळे ज्या दुष्काळी भागाला फायदा होतो त्याच्या पहिल्या टप्प्याचे पाणीपूजन करतांना या दोन्ही प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी त्वरीत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी  दुष्काळी दौऱ्यावर असतांना जाहीर केले होते. या अनुषंगाने टेंभू आणि उरमोडी प्रकल्पांच्या पम्प हाऊसची आणि कालव्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे दुष्काळी भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचे पाणी आणि चारा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याने दुष्काळी भागातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
उरमोडी प्रकल्पातंर्गत परळी गावाजवळ कृष्णा नदीच्या उरमोडी या उपनदीवर 9.96 टी.एम.सी. क्षमतेचे धरण बांधून त्याद्वारे सातारा तालुक्यातील 8,300 हेक्टर, खटाव तालुक्यातील 9,725 हेक्टर आणि माण तालुक्यातील 9,725 हेक्टर असे एकूण 27,750 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येणार आहे.
टेंभू प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यासाठी 11 कोटी 10 लाख, सांगली जिल्ह्यासाठी 58 कोटी 22 लाख, तर सोलापूर जिल्ह्यासाठी 3 कोटी 68 लाख निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातून जोडकालवा, स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी कामे अशा प्रकारची कामे केली जाणार आहे. टेंभू प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात विशेषत: तासगाव, खानापूर, कडेगांव, आटपाडी, सांगोला हे दुष्काळग्रस्त तालुके येतात. या ठिकाणचे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
00000000
नागपूर येथील 429 कोटी रूपयांच्या कॅन्सर रूग्णालयाच्या
प्रस्तावास मुख्यमंत्री चव्हाण यांची मान्यता
मुंबई, दि. 27 : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या परिसरात नवीन कॅन्सर रूग्णालय सुरू करण्याच्या 429 कोटी 78 लाख रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मान्यता दिली.
नागपूर आणि लगतच्या जिल्ह्यातील तसेच मध्य भारतातील कॅन्सर रूग्णांच्या उपचारासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न होता. याचा भाग म्हणून कॅन्सर रूग्णांवर व्यापक उपचार सुविधा एकाच ठिकाणी करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री चव्हाण यांनी हा निर्णय घेतला.
रूग्णालयाच्या बांधकामासाठी आणि अत्याधुनिक उपकरणांसाठी 378 कोटी 47 लाख रूपये ‘नॅशनल कॅन्सर ग्रीड’ अंतर्गत महाराष्ट्र शासनास उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनास विनंती करण्यात येणार आहे.
दर्जेदार बांधकाम व अत्याधुनिक सुविधेवर भर द्या
       नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. या ठिकाणी उभारले जाणारे कॅन्सर रूग्णालयाचे बांधकाम दर्जेदार व्हावे, तसेच या रूग्णालयासाठी घेण्यात येणारी सर्व उपकरणे अत्याधुनिक असावीत, त्यादृष्टीनी संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले.
00000

तृणधान्य, कडधान्याच्या बियाणांची कमतरता 
भरून काढण्यासाठी प्रमाणित बिजोत्पादन कार्यक्रम

      राज्यातील ज्वारी, बाजरी, भात व गहू या तृणधान्य तसेच कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या प्रमाणित बियाणांची कमतरता भरून काढण्यासाठी ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्याचा निर्णय आज घेण्यात आला. 100 टक्के शुध्द बियाणे तयार करणारा हा कार्यक्रम पंचवार्षिक योजनेतून राबविण्यात येईल.
पिकांच्या उत्पादन वाढीत बियाणे हा महत्वाचा घटक आहे. कोणत्याही जातीची उत्पादन क्षमता ही त्यामध्ये असणाऱ्या शुध्दतेवर अवलंबून असते. या योजनेमध्ये बियाणांवर प्रक्रीया करण्यासाठी बिज प्रक्रीया केंद्रे व बियाणे साठविण्यासाठी गोडावून उभारण्यात येतील.
       ज्वारी, बाजरी, भात व गहू या तृणधान्य तसेच कडधान्य व गळीत धान्य पिकाचे वार्षिक 80,000 क्विंटल  बियाणे उत्पादन करण्याचे नियोजन असून त्याकरीता प्रति क्विंटल 500 रुपये प्रमाणे सुमारे 4 कोटी रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. शेतकरी समूहामार्फत उत्पादीत बियाणांवर प्रक्रीया करण्यासाठी 50 टक्के अनुदानावर (20 लाख रुपये प्रति बिज प्रक्रीया केंद्र याप्रमाणे)  राज्यात दरवर्षी 30 बिज प्रक्रिया केंद्रांची उभारणी करण्यात येईल.
       या प्रक्रीया केंद्रावरील प्रक्रिया केलेले बियाणे साठविण्यासाठी राज्यात दर वर्षी (प्रति गोडावून 10 लाख रुपये अनुदान)  30 गोडावून उभारण्यात येतील. या योजनेत शेतकरी/शेतकरी समूह/बिजोत्पादक संस्था /महाबीज हे लाभार्थी असतील.
       या योजनेसाठी प्रतिवर्षी 13  कोटी रुपये प्रमाणे पंचवार्षिक योजनेंतर्गत 65 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

तालुका बिजगुणन प्रक्षेत्रावर पायाभूत सुविधा वाढविणार
उत्तम प्रतीची आणि खात्रीशीर बियाणे शेतक-यांना उपलब्ध व्हावे म्हणून कृषि विभागाकडून तालुका बीज गुणन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. राज्यात एकूण 194 तालुका बिजगुणन केंद्र असून या केंद्रांचे परिरक्षण व प्रक्षेत्रांवर सिंचनाची सुविधा वाढविण्यासाठी राज्यस्तरावर तालुका बिजगुणन प्रक्षेत्रावर पायाभूत सुविधा वाढविणे ही योजना राबविण्यास देखिल आज मान्यता देण्यात आली. 
प्रक्षेत्रावर बिजोत्पादन, शेतक-यांसाठी प्रात्यक्षिके, तसेच शेती संलग्न पुरक कार्यक्रम जसे गांडूळ कल्चर, गांडूळ खत उत्पादन, जैविक नियंत्रणाचे घटक उत्पादीत करणे, नाडेप पध्दतीने कंपोष्ट खत तयार करणे, निम पावडर, निमआर्क उत्पादन करणे असे विविध कार्यक्रम घेऊन तालुका बिजगुणन केंद्र अधिक कार्यक्षम करण्यात येणार आहे. तसेच परिरक्षण, गौण बांधकामे, सामुग्री व पुरवठा, यंत्र सामुग्री व साधन सामुग्री इ. बाबींद्वारे उपलब्ध होणा-या तरतूदीमधून तालुका बिजगुणन प्रक्षेत्रावर पायाभूत सुविधा निर्माण करून प्रक्षेत्राचे बळकटीकरण करण्यात येणार  आहे.
  ही योजना कार्यालयीन प्रक्षेत्रावर राबविण्यात येणार असून या योजनेत कोणीही वैयक्तिक लाभार्थी नाही. या योजनेसाठी प्रतिवर्षी 5 कोटी रुपये प्रमाणे पंचवार्षिक योजनेंतर्गत 25 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन ठरविण्यात आले आहे.
-----0-----
राज्यात मुलींसाठी 14 नवीन वसतिगृहे बांधण्याचा निर्णय
उच्च शिक्षणातील मुलींची गळती थांबविण्यासाठी मुलींना शिक्षण सुविधेच्या ठिकाणी 14 नवीन वसतिगृहे बांधण्याचा किंवा विस्तार करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
सध्या असलेली वसतिगृहांची व्यवस्था ही अत्यंत तुटपूंजी असून बऱ्याचशा मुलींना निवासाची व्यवस्था नसल्याने परगावी  शिक्षणास पाठविण्यास पालक तयार होत नाहीत. म्हणूनच मुलींची उच्च शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी तसेच  सर्व समाजघटकांच्या समावेशाचा विचार करुन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी  12 ठिकाणी 14 वसतिगृहे बांधण्याचा  किंवा त्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, सोलापूर, पनवेल,  गडचिरोली व जालना याठिकाणी 9 नवीन वसतिगृहे बांधण्यात येणार असून नागपूर येथील 2, औरंगाबाद, कोल्हापूर व अमरावती येथील प्रत्येकी 1 याप्रमाणे 5 वसतिगृहांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ  2250 विद्यार्थीनींना होईल. सदर वसतिगृहात शासकीय महाविद्यालयांशिवाय खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थीनीनाही प्रवेश देण्यात येणार आहे.
सध्या उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारित 16 प्रियर्दशनी वसतिगृहे, शासकिय महाविद्यालयांची मुले व मुलींची 21 वसतिगृहे, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 11 वसतिगृहे, मुंबई येथे 4 वसतिगृहे अशी एकूण 52 वसतिगृहे आहेत. त्यापैकी 27 वसतिगृहे मुलींसाठी असून याद्वारे 2150 विद्यार्थींना प्रवेश देण्यात येतो. 
-----0-----
 नाशिक व अमरावती येथे प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर सुरु करणार
 नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये व अमरावती येथे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या जागेत प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.  या निर्णयामुळे आता सर्व महसूली विभागांमध्ये अशा स्वरुपाचे ट्रेनिंग सेंटर कार्यरत होऊन ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा तत्सम  विविध स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यामध्ये  इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे असलेले अत्यल्प प्रमाण  वाढविण्यासाठी  राज्यात मुंबई , नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर अशी 4 प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर्स कार्यरत आहेत. या प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात 32 आयएएस अधिकारी व 138 तत्सम दर्जाचे अधिकारी उत्तीर्ण  झाले आहेत.
या सेवांमध्ये महाराष्ट्रीयन तरूणांचे प्रमाण वाढावे यासाठी आवश्यक असलेल्या परिक्षांची योग्य प्रकारे पुर्वतयारी करून घेण्यासाठी बोंगिरवार समितीच्या शिफारसींना विचारात घेवून हा निर्णय घेण्यात आला.
-----0------
राज्यातील 1,663 गावात पाणी टंचाई
     2,136 टँकरद्वारे पाणी पुरवठा

        राज्यातील 1 हजार 663 गावे व 4 हजार 490 वाड्यात पाणी टंचाई जाणवत असून त्या ठिकाणी 2 हजार 136 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. अद्यापही ज्या ठिकाणी टंचाई जाणवत असेल, त्या ठिकाणी आणखी टँकर्स तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
        टंचाई परिस्थितीत लोकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली एकूण 23 हजार 224 कामे सुरु असून या कामावर 2 लाख 23 हजार 694 इतके मजूर काम करीत आहेत.
राज्यात आतापर्यंत 518 जनावरांच्या छावण्या उघडण्यात आल्या असून यात 4 लाख 33 हजार 729 एवढी जनावरे आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 212, पुणे जिल्ह्यात 1, सातारा जिल्ह्यात 100, सांगली जिल्ह्यात 31, सोलापूर जिल्ह्यात 118, औरंगाबाद जिल्ह्यात 4, बीड जिल्ह्यात 27, जालना जिल्ह्यात 18, व उस्मानाबाद जिल्ह्यात 7 गुरांच्या छावण्या उघडण्यात आल्या आहेत.  यावर आतापर्यंत 32,973.89 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. चारा वितरणासाठी 749 कोटी 29 लाख एवढा निधी वितरित करण्यात आला आहे. 
राज्यात 37 टक्के पाणी साठा
        राज्यात एकूण 2 हजार 475 सिंचन प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये 13 हजार 830 दशलक्ष घनमिटर पाणी साठा असून पाणी साठ्याची टक्केवारी 37 टक्के एवढी आहे. गतवर्षी याच तारखेला राज्यात 42 टक्के पाणी साठा होता. राज्यातील कोकण विभागात सर्वाधिक म्हणजेच 61 टक्के पाणी साठा असून सर्वात कमी म्हणजेच 12 टक्के पाणी साठा मराठवाडा विभागात आहे.  नागपूर विभागात 42 टक्के, अमरावती विभागात 38 टक्के, नाशिक विभागात 29 टक्के तर पुणे विभागात 39 टक्के पाणी साठा आहे.
-----0-----

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

  प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी
 नाविन्यपूर्ण योजना राबवा : मुख्यमंत्री
            नागपूर,दिनांक 26 : महसूल विभागात काम करतांना बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासोबतच प्रशासन लोकाभिमुख कसे होईल व त्याचा उपयोग सामान्य माणसाला कसा होईल यादृष्टीने काम करा, शासन तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
              देशपांडे सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित महसूल अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव सन्मान सोहळयात ते बोलत होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय, विभागीय आयुक्त वेणू गोपाल रेड्डी यांचेसह सर्व विभागाचे आयुक्त व जिल्हाधिकारी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महसूल अधिकारी गौरव सन्मान दरवर्षी घेण्यात येईल. जमिनीची फेरमोजणी करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून याची खूपमोठी जबाबदारी महसूल विभागावर आहे. त्याचप्रमाणे आधारकार्डवर आधरित योजना यशस्वी करण्याची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. महसूल विभागातील रिक्त पदाबाबत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, दहा टक्के नोकरभरतीचा प्रस्ताव   पाठविल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळाची कामे गंभीरतेने पार पाडा, अशा सूचना  त्यांनी केल्या.
            राज्यसेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेची  परीक्षा देता यावी यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून त्याला लवकरच मंजूरी मिळणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांना पाच टप्यात प्रशिक्षण देण्याची योजना विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब थोरात यांनी नाविण्यपूर्ण योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. महसूल प्रशासन राज्याचा कणा असल्याचे सांगून दुष्काळी परिस्थिती अतिशय जबाबदारीने हाताळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. रिक्त जागा त्वरीत भरण्याची विनंती केली.  महसूल विभागाने गेल्यावर्षी 55 लाख जातीचे दाखले थेट शाळेत वितरीत केल्याचे त्यांनी सांगितले. शासनाचा कणा असलेल्या महसूल विभागाला नियतव्यय वाढवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
            महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी महसूल विभागावरील अतिरिक्त भार कमी करण्यासंदर्भात सूचना केली. मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुतनीकरण व प्रशासकीय सेवा दिवस साजरा करण्याची विनंती केली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी केले. नाविण्यपूर्ण कल्पना, कल्पनेची अंमलबजावणी, जनतेला झालेला लाभ व अनुकरणीय योजना या निकषावर पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुवर्ण जयंती राजस्वी अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामावर आधारित सी.डी.चे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
            पुरस्कार विजेत्यांची नावे खालीप्रमाणे- भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी- डॉ. अनुप यादव, एकनाथ डवले, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत दळवी, आबासाहेब जराड, कुणाल कुमार, श्रीकर परदेशी, श्रावण हार्डीकर, श्रीमती रिचा बागला, पी. वेलरासू, वीरेंद्र सिंह, अभिषेक कृष्णा व सौरभ राव.
            नागपूर विभाग : उपायुक्त एम.ए.एच.खान, श्रीमती किरण कुळकर्णी, प्रकाश पाटील, प्रसाद मते, एम.एन.सपाटे, एस.बी. जगताप, आर.एस. वाटघरे, व्ही.एन.गेडाम, श्रीमती मानसी जोशी, अमरावती विभाग : जितेंद्र वाघ, उपविभगीय अधिकारी संजय खडसे, नायब तहसीलदार सचिन पाटील, आर.एस.शेख, सुरेश बुटे, संजय सरागे, मोहन साठे, हरिदास भातकर. औरंगाबाद विभाग : अजय गुल्हाने, जगदिश मिनीयार, महेश शेवाळे, एस.एम.देशमुख, विवेक मंडलिक, एस.व्ही. शिंदे, महेश चामणीकर, एस.पी. उगले, बाबासाहेब बहिरट, शेख अफसर, नाशिक विभाग : गणेश पाटील, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, अमोल मोरे, एस.आर. सोनवणे, नरेश गावित, श्रीमती व्ही.एस. सावळे, नितीन डावखर, श्रावण दाबसे, कोकण विभाग : अजित पवार, नवनाथ जरे, डॉ. संदीप माने, बी.बी. जाधव, प्रकाश जाधव, भारत फुलपगारे, चंद्रकांत राजपूत, श्रीमती जी.सी. भाटकर, हिरालाल महाला, पुणे विभाग : सुहास दिवसे, श्रीमती स्नेहल बर्गे, संजय पवार, एस.डी. जानराव, एस.सी. परदेशीमठ, विनायक माने, सागर देसाई, संजय जंगम या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुरस्कारप्राप्त करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.


प्रवाशांच्या सेवासुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य देतानाच
रेल्वेच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 25 : सर्वसामान्य प्रवाशांवर भाडेवाढीचा बोजा न टाकता, अनेक नवीन गाड्या सुरु करण्याची घोषणा करणारा, प्रवाशांची सुरक्षा आणि सेवासुविधा यांना प्राधान्य देणारा आणि आजची परिस्थिती पाहता अतिशय समतोल असा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी सादर केला आहे. मुंबईच्या उपनगरी सेवेच्या 72 जादा फेऱ्या आणि उन्नत रेल्वे कॉरिडॉरला चालना यामुळे मुंबईकरांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. रेल्वेच्या विकासाला चालना देणाऱ्या या अर्थसंकल्पाचे मी मनापासुन स्वागत करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आज संसदेत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, 12व्या पंचवार्षिक योजनेत मुंबईतील उन्नत रेल्वे कॉरीडॉरसाठी गुंतवणूक करण्यासंदर्भात केलेली घोषणा, कल्याण-कर्जत दरम्यानचा तिसरा रेल्वेमार्ग आणि उपनगरीय रेल्वेला वातानुकुलित डबे जोडणे यासारख्या निर्णयांमुळे मुंबईमध्ये रेल्वेसेवा अधिक सक्षम होईल, मुंबईला देशाच्या इतर भागाशी जोडणाऱ्या काही नव्या एक्सप्रेस तसेच पॅसेंजर रेल्वे सुरू करणे, नवीन रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण त्याचप्रमाणे मार्गांचे दुपदरीकरण यामुळे देखील फायदा होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रेल्वेमंत्र्यांनी सर्वसामान्य प्रवाशांवर कोणताही बोजा पडणार नाही, याची काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे येत्या काळात आधुनिकीकरणाची कास धरून रेल्वे यंत्रणा अधिकाधिक कार्यक्षम करण्याचे धोरण स्वागतार्ह आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरला रेल्वे अर्थसंकल्पात बॉटलींग प्लॉन्ट, प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र यासाठी तरतूद केल्यामुळे विदर्भासारख्या भागालाही न्याय मिळाला आहे. रेल्वेमंत्र्यांनी देशाच्या सर्व भागांचा या अर्थसंकल्पात विचार केला आहे, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
00000

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३



ॲडव्हाँटेज विदर्भ परिषदेमुळे
औद्योगिक विकासाला नवी दिशा ... मुख्यमंत्री
                                                     *  उद्योजकांचा चांगला प्रतिसाद
               *  आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा शुभारंभ
                           *  18 हजार 461 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार
                                                    *   दरवर्षी ॲडव्हाँटेज विदर्भचे आयोजन करणार
       नागपूर,दिनांक 25 : भारताच्या हृदयस्थानी असलेल्या विदर्भाच्या औद्योगिक जलद विकासाला पोषक वातावरण निर्माण करण्यासोबत उद्योजकांनाही विशेष सवलती व दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून विदर्भाच्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच ॲडव्हाँटेज विदर्भ ही गुंतवणुकदारांची परिषद दरवर्षी आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. उद्योजकांनी  विदर्भात सर्वाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन यावेळी केले.
       हॉटेल सेंटर पॉईंट येथे ॲडव्हाँटेज विदर्भ ही औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकदारांची परिषद आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन झाले. यावेळी विदर्भात 18 हजार 461 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रस्तावावर सामंजस्य करार करण्याले आले. त्यानंतर उद्योजकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
       केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल पटेल, उद्योग मंत्री नारायण राणे, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया,  फिक्कीचे अध्यक्ष रसेस शहा,मारोती उद्योग समूहाचे अध्यक्ष आर.सी. भार्गव, भेल या उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी. प्रसादराव, रेमंड उद्योग समूहाचे प्रमुख गौतम हरिसिंगानिया, जिंदल उद्योग समूहाचे प्रमुख सज्जन जिंदल, श्री. शांडिल्य, देशातील नामवंत उद्योग उद्योजक, के.पी.एम.जी मार्केटींगचे प्रमुख प्रदीप उदास आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
       विदर्भाच्या भौगोलिक तसेच येथील साधन सूचितांवर आधारित उद्योगांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वाव असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री  म्हणाले की, वस्त्रोद्योग, फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग, पर्यटन आदी उद्योगांच्या विकासाला पोषक वातावरण असल्यामुळे नवीन औद्योगिक व वस्त्रोद्योग धोरणात विदर्भासह मागास भागासाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत. या सवलतीच्या आधारावर उद्योजकांनी आपले उद्योग या भागात सुरु करावे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

       विदर्भात उद्योग वाढीसाठी चांगले वातावरण असून नैसर्गिक साधन-सामुग्रीसह औद्योगिक शांतता असल्यामुळे उद्योजकांना उद्योग सुरु करतांना सर्व सुविधा एकत्र उपलब्ध करून देण्याचे  शासनाचे धोरण आहे. पर्यटन उद्योगाच्या विकासाला चांगल्या संधी असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, विदर्भात वाघांची संख्या वाढत आहे. तसेच समृद्ध जंगल पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. त्यासोबतच नवीन वस्त्रोद्योग धोरणानुसार विदर्भात कापसावर 100 टक्के  प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करण्याला चालना देण्यात आली आहे. वीज, पाणी, दळण-वळण आदी  सुविधा असल्यामुळे उद्योगाच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
         नवीन औद्योगिक धोरणाबद्दल बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, भारतातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट धोरण ठरविण्यात आले आहे. या धोरणासंदर्भात उद्योजकांकडून सूचना आल्यास त्याचा निश्चितच विचार करून त्यानुसार अधिक व्यापक व उद्योगांच्या विकासाला सर्वसामावेशक पोषक वातावरण निर्माण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
       उद्योगाच्या विकासासोबतच रोजगाराच्या संधी निर्मिती करणे महत्वाचे असून राज्यात येणाऱ्या सर्व उद्योगांना सुविधा उपलब्ध करून देतांना रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल  या परिषदेच्या माध्यमातून उद्योगांच्या विकासासाठी चांगले वातावरण निर्माण होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
       केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल पटेल यांनी विदर्भाच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा ॲडव्हाँटेज विदर्भ हा उपक्रम असून महाराष्ट्र शासनाने विशेष अभिनंदन करतांना सामंजस्य करारानंतर प्रत्यक्ष उद्योग उभारणीला सुरुवात होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मिहान या महत्वपूर्ण प्रकल्पामध्ये बोईंगसह इन्फोसिस यांनी मोठी गुंतवणूक केली असून हा प्रकल्प लवकरच नवी झेप घेईल. भंडारा येथे भेलचा 500 कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प येत असून इतरही उद्योग येण्यास उत्सुक आहेत. राज्य शासनाने विजेच्या दरामध्ये सवलतीचे धोरण   स्वीकारावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
       दिल्लीच्या प्रगती मैदानाच्या धर्तीवर नागपूर अथवा बुटीबोरी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी स्थळ विकसित केल्यास  ऑटोएक्स्पो संदर्भातील प्रदर्शन येथे भरविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

       उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले, नवीन औद्योगिक धोरणात मागास भागातील उद्योगांच्या विकासासाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.   नागपूर तालुका वगळता संपूर्ण विदर्भला डी प्लस दर्जा दिला आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योगांसाठी आवश्यक जागा उपलब्ध असल्यामुळे उद्योजकांनी उद्योग  सुरु केल्यास संपूर्ण सहकार्य देण्यात येईल. तसेच बुटीबोरी येथे 50 एकर जागेवर अद्ययावत कन्व्हेंशन सेंटर सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.

       प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ॲडव्हाँटेज विदर्भ या गुंतवणुकदारांच्या परिषदेचे दीप प्रज्वलीत करून उदघाटन केले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी स्वागत करून प्रास्ताविक भाषणात विदर्भातील उद्योजकांना असलेल्या संधीची माहिती दिली.
       यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक व मारुती सुजुकी उद्योग समूहाचे अध्यक्ष आर.सी. भार्गव, भेलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी.प्रसाद राव, रेमंड उद्योग समूहाचे प्रमुख गौतम हरिसिंघानीय, जिंदल उद्योग समूहाचे सज्जन जिंदल आदींनी या परिषदेत आपले मनोगत व्यक्त केले. के.पी.एम.जी. मार्केटचे प्रमुख प्रदीप उदास यांनी विदर्भातील उद्योग उभारणीच्या विविध संधीबाबत परिषदेत सादरीकरण केले. तसेच यावेळी ॲडव्हाँटेज विदर्भ संदर्भात बिझनेस डेस्टीनेशन या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
उद्योग विभागातर्फे 16 उद्योजकांच्या उद्योग उभारणी संदर्भातील सामंजस्य करारावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 8 प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत 18 हजार 461 कोटी रुपये गुंतवणुकीच्या  प्रस्तावावर स्वाक्षऱ्या झाल्या. 
       यावेळी मंडळातील सदस्य, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, संपूर्ण देशातून आलेले उद्योजक, औद्योगिक प्रतिष्ठानांचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल दोषी यांनी आभार मानले.
                                                                        ***